भाजप नेते म्हणतात – ‘हे राज्य नेमकं चालवतंय तरी कोण? महाविकास आघाडी की सचिव मंडळी?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  ‘माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर निर्णय घेतला असल्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटल्याचा संदर्भ भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिला. त्यावरून त्यांनी ट्विट करत पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘हे राज्य कोण चालवतंय? महाविकास आघाडी की सचिव मंडळी? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

एमपीएससी परीक्षेच्या मुद्यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. त्यातच सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे, असे वक्तव्य केले होते. त्याचा अतुल भातखळकर यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यावर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले, की माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे, असे मंत्री वडेट्टीवार म्हणतात. याचा अर्थ राज्यातले सचिव आपल्या मंत्र्यांनादेखील जुमानत नाहीत. एवढं हे दुबळं सरकार आहे. असाच होतो… हे राज्य कोण चालवत आहे? महाविकास आघाडी की सचिव मंडळी?

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण आणि आता एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय यांसारख्या प्रकरणांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली आहे.

शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई

‘शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले. एल्गार परिषदेत केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी तो पुण्यात आला आणि गुपचूप निघून गेला. सरकारने इतकी गोपनीयता पाळली की, या कानाचे त्या कानाला कळले नाही. हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.