वर्ल्डकपची सुरुवात ३० जूनला होऊनही भारतीय संघाचा सामना एवढ्या उशिरा का ? जाणून घ्या कारण..

साउथेम्प्टन : वृत्तसंस्था – काल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या वर्ल्डकपच्या सामन्यात भारतीय संघाने ६ विकेट्सनी विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. मात्र या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली एक विक्रम करण्यापासून हुकला. या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतकी खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. मात्र भारतीय चाहत्यांना एक प्रश्न पडला आहे, तो म्हणजे स्पर्धेला सुरुवात होऊन सात दिवस झाल्यानंतर भारतीय संघ इतक्या उशिरा आपला सामना का खेळला. तर आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) वेळापत्रकानुसार भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेत २ जूनला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार होता. मात्र लोढा समितीच्या शिफारशीनुसार भारतीय संघाच्या दोन स्पर्धांमध्ये कमीतकमी १५ दिवसांचे अंतर असावे, त्यामुळे हे लक्षात घेता भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी खेळवण्यात आला. त्यामुळे आयपीयल स्पर्धा १२ मे रोजी संपली त्यानुसार १५ दिवसांचा कालावधी हा २७ मे रोजी पूर्ण होत होता. त्यानुसार भारताचा सामना हा २ जून रोजी ठेवण्यात आला होता.

दरम्यान आयपीयल स्पर्धेचा अंतिम सामना हा अगोदर १९ मे रोजी खेळवला जाणार होता, मात्र वेळापत्रकात बदल झाला आणि तो बारा रोजी खेळवला गेला, त्यामुळे १९ तारखेचा विचार करताना भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे भारताला फायदा देखील झाला. जखमी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याला दुखापतीतून सावरण्यासाठी यामुळे वेळ मिळाला.