म्हणून अयोध्येनंतर उद्धव ठाकरेंनी पंढरपूरच निवडलं

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांची तिथे सभा होणार आहे. दरम्यान महिन्याभरापूर्वीच त्यांनी अयोध्या दौरा करून तिथे शक्तिप्रदर्शन केले यानंतर आता आज ते पंढरपूरात सभा घेणार आहेत. पंरतु उद्धव ठाकरेंनी पंढरपूरचीच निवड का केली? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात विठ्ठलाशिवाय आहे काय? विठोबा म्हणजे सावळा राम. अयोध्येनंतर पंढरपूर निवडणं ही उद्धव ठाकरेंची रामभक्तीच आहे. विठुमाऊली हे शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांच, सामान्यांचं दैवत आहे आणि महाराष्ट्रातला कष्टकरी, शेतकरी आज संकटात आहे,”त्यामुळे पंढरपूर निवडल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

“प्रभू श्रीरामाचे जे कार्य शिवसेना पुढे घेऊन जात आहे त्यातील अयोध्येनंतरचा पुढचा टप्पा पंढरपूर आहे. आजचा हा दौरा पंढरपूरातील ही एक वारी आहे आणि या वारीच्या माध्यमातून नक्कीच एक राजकीय संदेश जाईल,”असे राऊत म्हणाले.

अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा महत्वाचा दौरा मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर भगवेमय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पंढरपूर दौऱ्यामध्ये उद्धव यांची सभाही होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेमध्ये  राम मंदिर, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यावर नेमकं काय भाष्य करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.