BMC मध्ये महाविकास एकत्र लढणार ? की…, उपमुख्यमंत्री पवार म्हणाले…

मुंबई – पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई महापालिकेच्या (mumbai municipal corporation) निवडणुकीला आता वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीबाबत सूचक आणि मोठे विधान केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (mumbai municipal corporation) निवडणुकीत महाविकास आघाडी करून लढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली मुंबई महानगरपालिका काहीही करून ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. तर गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेतील सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून ही निडणूक महाविकास आघाडी करून लढण्याबाबत चाचपणी सुरू आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करून लढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेमध्ये आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मित्रपक्षांसोबत मिळून ही निवडणूक लढवावी, अशी चर्चा सुरू आहे. मात्र या बाबतचा अंतिम निर्णय शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे घेणार आहेत. आघाडी करून लढल्याने मतविभागणी रोखता येईल. अन्यथा तुला नाही मला, दे तिसऱ्याला असे होईल, असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत काँग्रेसचे नेते देत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी सांगितले की याविषयावर आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढणार आहोत.