बोट दुर्घटना : ‘नियोजनशून्यतेने सिद्धेश पवारचा बळी’ – जयंत पाटील 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाली. कार्यक्रमाला गालबोट लागलं. कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाल्यामुळे सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, नियोजनशून्यतेमुळे हा अपघात झाल्याची टीका शेकाप नेते जयंत पाटील यांनी केली आहे. इतकेच नाही तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत बसवल्याचा आरोपही पाटलांनी केला. बचावकार्यासाठी आपण दोन बोटी पाठवल्याची माहितीही जयंत पाटील यांनी दिली. पायाभरणी कार्यक्रमाला जाताना तटरक्षक दलाला सोबत का नेलं नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मूळचा कोकणचा रहिवासी असलेला सिद्धेश कुटुंबीयांसह मुंबईत सांताक्रुझ परिसरात राहत होता. सिद्धेश पवार हा विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचा कार्यकर्ता होता. सिद्धेश नुकताच विवाहबंधनात अडकला होता. सिद्धेश हा व्यवसायाने सीए होता. शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी भरलेली स्पीडबोट समुद्रात निघाली होती. त्यावेळी बोट दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला.
स्पीडबोटच्या अपघातानंतर सिद्धेश बेपत्ता असल्याची माहिती आपत्कालीन यंत्रणेने दिली होती. सिद्धेशविषयी माहिती मिळताच त्याचे मामा विक्रांत आंग्रे बेशुद्ध पडले होते. बोट किनाऱ्यावर आणल्यानंतर दुर्दैवाने सिद्धेशचा मृतदेहच आढळला. पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची स्पीडबोट दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला होता. त्यानंतर शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी आयोजित आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
दरम्यान, शिवस्मारक पायाभरणीला जाताना बुडालेल्या स्पीडबोटमधून एक जण वगळता सर्वांना वाचवलं, वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला, या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.