बिडीनं केलं काडीचं काम ; २५ एक्कर ऊस जळून खाक

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – रेणापूर तालुक्यातील डिगोळ देशपांडेवाडी शिवारातील तब्बल २५ एक्कर ऊस जळाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ च्या दरम्यान घडली आहे. ऊस तोडताना बिडी पिणाऱ्या कामगाराने बिडी फडात टाकल्याने आग लागली असल्याचे बोललं जात आहे. यात आग विझवण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती, देशपांडेवाडी शिवारात काही दिवसांपासून उस तोडणीचे काम सुरु होते. शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान शिवारातली २५ एक्कल उसाला अचानक आग लागली. आग विझवण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागरबाई जोगदंड यांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत शेतकऱ्यांचे उसाबरोबरच ठिबकचे पाईप, पाईपलाइनचे मोठे नुकसान झाले आहे. उसतोडणीचे काम सुरु असताना कामगाराने पेटलेली बिडी उसाच्या फडात टाकल्यानेच ही आग लागल्याचे बोलले जात आहे.

शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक तर गेलंच पण पीक वाचवण्यासाठी आग विझवण्याचे प्रयत्न करताना नागबाई यांना मात्र आपला जीव द्यावा लागला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.