राज्याची चिंता वाढली ! 24 तासात ‘कोरोना’चे 2682 नवे रुग्ण तर 116 जणांचा मृत्यू, ‘विक्रमी’ 8381 रुग्ण झाले बरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 2682 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 116 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 8 हजार 381 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 26 हजार 997 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 43.38 टक्के झाले आहे. तसेच रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11 दिवस होता तो आता 15.7 दिवस झाला आहे. तर दुसरीकडे मृत्यूदर 3.37 टक्के इतका खाली आला आहे.

कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्येने आज उच्चांक गाठला आहे. एकाच दिवशी एवढे रुग्ण बरे होऊ घरी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज बरे झालेल्या रुग्णांपैकी 7358 रुग्ण हे मुंबई महापालिका क्षेत्रातील आहे. आतापर्य़ंत राज्यभरात 26 हजार 997 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नमूद केलं आहे.

राज्यात गेल्या 24 तासात आलेल्या संख्येनंतर आता महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 62 हजार 228 इतकी झाली आहे. आतापर्य़ंत राज्यात 26 हजार 997 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्याच्या घडीला 33 हजार 124 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत, असंही आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या 5 लाख 35 हजार 467 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 35 हजार 967 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात गेल्या 24 तासात 116 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 77 पुरुष आहेत तर 39 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 116 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील वयाचे 48 रुग्ण होते. 55 रुग्ण हे 40 ते 59 वयोगटातील होते. तर 13 जण 40 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे होते. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2098 झाली आहे.