‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी मुलींना प्रेमविवाह न करण्याची ‘शपथ’ देणार्‍या 3 प्राध्यापकांचं ‘निलंबन’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – व्हॅलेंटाइन दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘मी प्रेमविवाह करणार नाही’ अशी शपथ महाविद्यालयीन विद्यार्थिनींनाना दिल्याप्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली आहे. ही शपथ देणाऱ्या तीन प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, १३ फेब्रुवारी रोजी चांदुर रेल्वे येथील विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी संचालित महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात हा प्रकार घडला. टेंभुर्णा येथे घेण्यात आलेल्या या शिबिरात प्रेमविवाहाबाबत देण्यात आलेल्या शपथेने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

माजी महिला – बालकल्याण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील या प्रकरणावर ट्विटरच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला होता. ‘कॉलेजात मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देणे हा विचित्र प्रकार आहे. ही शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची… त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला हवी की, एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही. कोणावर अ‍ॅसिड फेकणार नाही, कुणाला जिवंत जाळणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला चोख प्रत्युत्तर देईन, असे त्यांनी लिहिले होते.

दरम्यान, अखेर १३ दिवसांनंतर संबंधित प्रकाराला जबाबदार असलेल्या तीन प्राध्यापकांवर कारवाई करण्यात आली आहे. विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या सूचनेवरून संस्थेचे सचिव युवराजसिंग चौधरी यांनी ही कारवाई केली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. हावरे, प्रा. डॉ. पी. पी. दंदे व राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. डी. कापसे या तिघांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. तसेच महाविद्यालयात कोणतेही नियमबाह्य प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असेही संस्थाध्यक्षांनी बजावले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?
वास्तविक, ‘युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर आयोजित शिबिरात प्रा. प्रदीप दंदे यांनी आजच्या युवकांपुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळी, त्यांनी ‘आईबाबांवर विश्वास नाही का? त्या तुमचे लग्न योग्य मुलाशी करून देणार नाही का ?’ असे प्रश्न करीत प्रेमविवाह न करण्याचीही शपथ दिली. त्यासोबत हुंडा न घेण्याचा निर्धारही करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘सध्याच्या रीतीरिवाजानुसार कुटुंबाने माझे लग्न हुंडा देऊन लावले तर भावी पिढीतील एक माता म्हणून माझ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही व मुलीसाठी हुंडा देणार नाही’, अशी शपथ मुलींना देण्यात आली. यांनतर वातावरण पेटले होते.