सध्याच्या राजकारणावर ‘सिनेमा’ काढायला हवा, राज्यातील ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका वृत्तवाहिनीने बाळासाहेब थोरात यांची मुलाखत घेतली असता त्यात त्यांनी सध्याच्या राजकारणावर बोलताना सांगितले की, “गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात जे ‘ट्विस्ट अँड टर्न’ झाले त्यावर लवकरच एक चित्रपट काढला पाहिजे कारण या सिनेमाची स्क्रिप्ट तयार आहे”, अशी भावना महाराष्ट्र सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले आहे. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर शपथ घेतली. शिवतीर्थावरील या सोहळ्यात अन्य सहा मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. यात काॅंग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी देखील शपथ घेतली आहे.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणायचे की मला समोर विरोधी पक्ष दिसत नाही, मी म्हणायचो आरशासमोर उभे रहा मग तुम्हाला विरोधी पक्ष दिसेल. आणि ते खरं ठरले. माझा विश्वास होता बदल निश्चित होईल आणि तो झाला. तसेच त्यांना शिवसेनेसोबत जाण्याचे देखील विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, शिवसेनेसोबत जाणं अवघड होतं. पण मागील इतिहास पाहिला तर बाळासाहेब ठाकरे यांनी देखील इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता. तो इतिहास कामी आला, आणि महाविकास आघाडीचे सरकार बनले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेली ४ महिने खूप धावपळ होती. आता थोडा रिलॅक्स आहे. कारण पहिला टप्पा काल पूर्ण झाला आहे. आजपासून कामाला सुरुवात झाली आहे, असेही ते म्हणाले. आता माझं कुटुंब फक्त घरापूरतेच मर्यादित राहीले नाही तर आता संपूर्ण राज्य, कार्यकर्ते हे सगळे माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहेत असे थोरात म्हणाले.

अजित पवार हे भाजपासोबत गेले, उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली. पुन्हा परत माघारी आले या सगळ्या घडामोडींबद्दल मला काही बोलायचे नाही असे त्यांनी सांगितले. परंतु मागील काही दिवसात ज्या काही नाट्यमय घडामोडी झाल्या त्याबाबत ते म्हणाले की, मागील काही दिवसात जे ट्विस्ट अँड टर्न झाले त्यावर लवकरच एक चित्रपट काढला पाहिजे कारण स्क्रिप्ट तर तयार आहे. अशा पद्धतीने त्यांनी आपले मत मांडले.

थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे याकडे आता आमचं सरकार म्हणजेच महाविकास आघाडी लक्ष देईल, असंही ते म्हणाले. शपथविधीच्या आधी काही ज्येष्ठ नेत्यांची नावं घेण्यावरुन राज्यपाल महोदय नाराज झाले होते. ते नाराज का झाले याबाबत माहित नाही. पण ज्येष्ठ नेत्यांचं नाव शपथविधी दरम्यान घेणं मला नाही वाटत काही गैर आहे. लाखो लोक एक ठिकाणी येत असतील तर थोडं फार व्यवस्थेत इकडं तिकडं होऊ शकतं, मात्र कालच्या शपथविधीमध्ये शिस्त आपल्याला पाहायला मिळाली, असेही मंत्री बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केले.

Visit : Policenama.com