नुकत्याच सत्ता हाती आलेल्या कमलनाथ सरकारची ‘वंदे मातरम्’ गीत म्हणण्यावर बंदी 

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशात नुकतंच काँग्रेसचं सरकार आलं असून कमलनाथ मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. मध्यप्रदेशमधील राज्य सचिवालयाबाहेर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काम सुरू करण्याच्या आधी वंदे मातरम् म्हणण्याची पद्धत होती. परंतु काँग्रेस सरकारनं ती पद्धत बंद केली आहे.
कमलनाथ सरकारनं काँग्रेस सरकारमधील कर्मचाऱ्यांना वंदे मातरम् गीत म्हणण्यावर बंदी घातली आहे. वंदे मातरम् म्हणण्यापेक्षा जनतेच्या कल्याणाची कामं करण्यावर लक्ष्य केंद्रित करा, असं कर्मचाऱ्यांना सांगत कमलनाथ सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच दर महिन्याच्या पहिल्या तारखेला भोपाळमध्ये होणाऱ्या वंदे मातरमचं गीत गायन १ जानेवारी २०१९ रोजी झालेलं नाही. परंतु तत्पूर्वीच्या सरकारमध्ये हे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला नित्य नियमानं होत होतं.
निर्णयावर भाजपची टीका
कमलनाथ सरकारच्या राज्यात कर्मचाऱ्यांना वंदे मातरम् बोलण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्या वंदे मातरमसाठी स्वातंत्र्याचं युद्ध लढण्यात आलं, त्याच्याशी काँग्रेसचं काही देणंघेणं नसून त्यावरूनच त्यांच्या मानसिकतेचं दर्शन घडतं, या शब्दात कमलनाथ यांच्या या निर्णयावर भाजपानं टीका केली आहे.
भाजपा सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या उमा शंकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.सूर्यनमस्काराला जगानं स्वीकारलं आहे, त्यावरही काँग्रेस बंदी घालू पाहत आहे. काँग्रेस समाजात नकारात्मकतेचं विष पसरवत असल्याची टीकाही उमा शंकर यांनी केली आहे.
मध्य प्रदेशाच्या निवडणुकीत भाजपच्या १५ वर्षांच्या सत्तेला शह देत काँग्रेस सत्तेत आले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या अडीच तासांत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फाईलवर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.