चंबळ नदीत 50 प्रवाशांसह बोट उलटली

कोटा : वृत्तसंस्था – बुधवारी सकाळी राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली. चंबळ नदीत एक बोट उलटली. त्यामध्ये एकूण ५० प्रवासी होते. या प्रवाशांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश होता. बुंदी जिल्ह्याच्या सीमेवर गोठडा कला गावाजवळील चंबळ नदीत ही घटना घडली. या बोटीत प्रवाशांबरोबर काही सामान आणि वाहनेसुद्धा भरण्यात आली होती. प्रवासी बोटीतून कमलेश्वर धामकडे जात होते. परंतु नदीच्या मध्यभागी येताच ही बोट उलटून हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार २० जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर ६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये २ महिला व ४ पुरुषांचा समावेश आहे. उर्वरित प्रवाशांचा अजून शोध सुरु आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बोटीत अधिकांश वयस्कर व्यक्ती, महिला आणि मुलांचा समावेश होता.या मधील बऱ्याच लोकांना नीट पोहता पण येत नव्हते. ही घटना बुधवारी सकाळी ९ वाजता घडली.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं तातडीनं हालचाली करत प्रवाशांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. तसेच एसडीआरएफच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. या घटनेवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुःख व्यक्त केले आहे. या ठिकाणी बोटींचं संचालन सुरू असलं तरी कोणत्याही प्रकारच्या दुर्दैवी प्रसंगी बचावात्मक पद्धतीची कोणतीही सुविधा किंवा उपकरणं उपलब्ध नाही आहेत.