Bihar Election Results : काँग्रेसची नितीश कुमारांना ऑफर, म्हणाले – ‘संघ, भाजपाची साथ सोडा, महाआघाडीसोबत या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भाजप मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे यावेळी बिहारमधील सत्तेची गणिते बदलणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तीन ट्विट केले असून, त्यामध्ये त्यांनी नितीश कुमार यांना संघ आणि भाजपची साथ सोडण्याचे आवाहन केले आहे.

ते म्हणाले की, भाजप आणि संघ हे अमरवेलीप्रमाणे आहेत. ते ज्या झाडाला विळखा घालतात. ते झाड वाळून जाते. नितीशजी लालू प्रसाद यादव यांनी तुमच्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनांमध्ये सोबत तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे संघ आणि भाजपच्या विचारधारेला सोडून तेजस्वी यांना आशीर्वाद द्या आणि अमरवेलीसारख्या असलेल्या भाजप आणि संघाला बिहारमध्ये वाढण्यापासून रोखा.

नितीशजी आता तुमच्यासाठी बिहार हे खूप छोटे झाले आहे. आता तुम्ही देशाच्या राष्ट्रीय राजकारणात या. सर्व समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये ऐक्य घडवून आणण्यास मदत करा. इंग्रजांनी वाढवलेली फूट पाडा आणि राज्य करा ही संघाने जोपासलेली नीती हाणून पाढण्यासाठी प्रयत्न करा, याचा जरूर विचार करा, असे आवाहन दिग्विजय सिंह यांनी केले.

हीच महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या प्रति खरी श्रद्धांजली असेल. तुम्ही त्यांच्याच वारशामधून समोर आलेले नेते आहात. आता तिथेच या. जनता पक्ष संघाच्या दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून फुटला होता. याचीही त्यांनी यावेळी आठवण करून देत भाजप आणि संघाची साथ सोडा आणि देशाचा विनाश होण्यापासून वाचवा, असेही त्यांनी म्हटले आहे.