राज्य सरकार नौटंकीबाजीमध्ये लागलंय; फडणवीसांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यावरून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. ‘सगळं केंद्राने करायचे आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेले आरक्षण घालवायचे हे किती दिवस चालणार? असा सवाल उपस्थित केला.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देणारा कायदा रद्द ठरवला आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले, की ‘सगळे केंद्राने करायचे आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेले आरक्षण घालवायचे हे किती दिवस चालणार? अशोक चव्हाणांनी कायदा समजून आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका कोण करू शकते यासंदर्भात विचार करायला हवा. 50 टक्क्यांवरचे आरक्षण राज्याने दिले होते. त्यामुळे याविरोधात केंद्र सरकार कशी पुनर्विचार याचिका करेल?’.

दरम्यान, आपले अपयश लपवण्यासाठी प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे हे लोक. मी केंद्राचे अभिनंदन करेन की इतक्या वेगाने केंद्राने ही भूमिका मांडली. राज्य सरकार हे नौटंकीबाजीमध्ये लागले आहे. तुम्हाला माहिती नाही का की गव्हर्नरच्या हातात काही नाही. एखाद्या समाजाला मागास घोषित करायचं असेल, तर इंदिरा साहानींचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने याही प्रकरणात गृहित धरला आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.