भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर ‘घणाघात’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षपूर्तीनिमित्त भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी (bjp-leader-pankaja-munde) सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत, तर दुसरीकडे अनेक विषयांवर भाष्य करत ठाकरे सरकारचा समाचार घेतला. सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्यांना मतदारांकडून जनादेश नव्हता. मात्र, तरीही त्यांनी सरकार स्थापन केले. त्यामुळे सरकार टिकवणे याच गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिले आहे. जनहित त्यांच्यासाठी प्राधान्याचा विषय नसल्याची टीका मुंडे यांनी केली आहे. अंगावर येणाऱ्यांच्या मागे हात धुऊन लागण्याचा इशारा देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray ) विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. लढाई ही मुद्द्यांची असावी, वैयक्तिक नसावी. त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपावी. आम्हीदेखील जपू, असे मुंडे म्हणाल्या.

मुंडे म्हणाल्या, सरकार स्थापन झाल्यावर लगेच टीका करणे प्रशस्त वाटत नाही. त्यामुळेच सुरुवातीला मी कोरोना संकटात काही बोलले नाही. पण त्यानंतर अनेकदा सरकार गोंधळलेले दिसले. शाळा सुरू करण्याचा निर्णय असो वा मग अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा, सरकारमधील गोंधळ वारंवार समोर आला. मराठा आरक्षणाबद्दल आमच्या सरकारची भूमिका अतिशय सकारात्मक होती. पण आताच्या सरकारच्या भूमिकेमुळे समाजात नाराजी आणि संताप आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्नही कायम आहे. धनगरचे धनगड करण्यासाठी 70 वर्षे लागतात, ही बाब दुर्दैवी आहे, असे त्या म्हणाल्या. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने हात थोडा सैल सोडावा. राज्याला केंद्राची मदत मिळणे क्रमप्राप्त आहे. पण राज्य सरकारने आधी मदत करून मग केंद्राकडे पाठपुरावा करावा, असा मार्ग त्यांनी राज्य सरकारला सुचवला आहे.