मोदी सरकारचे 40 हजार कोटी वाचविण्यासाठी फडणवीस 3 दिवसांचे मुख्यमंत्री झाले, ‘या’ भाजप खासदाराचा ‘गौप्यस्फोट’

बेंगळुरू : वृत्तसंस्था – केंद्र सरकारचे 40 हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी बहुमत नसतानाही फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले होते, असा आरोप भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. कर्नाटकात शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.

हेगडे म्हणाले की, ‘आमचा माणूस 80 तासांसाठी मुख्यमंत्री बनला आणि राजीनामा दिला. पण हे नाट्य का केले गेलं? आमच्याकडे बहुमत नाही हे माहित असतानाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले, हा एक प्रश्न सगळेच विचारतात. केंद्र सरकारचा 40 हजार कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून होता. दरम्यान, फडणवीस यांना माहिती होते की जर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार सत्तेत आले तर ते विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करतील. त्यामुळेच हा निधी परत केंद्राकडे पाठवण्यासाठी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचं नाटक करण्याचं ठरलं. त्यानुसार, फडणवीस हे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर 15 तासांत त्यांनी 40 हजार कोटी रुपये पुन्हा केंद्राकडे पाठवून दिले. ही योजना पूर्वीपासूनच भाजपाने बनवून ठेवली होती. ही योजना अंमलात आणण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा असतानाच 23 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र अजित पवार यांनी माघार घेतल्याने फडणवीस बहुमत सिद्ध करू शकले नाहीत व केवळ 80 तासांतच बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच राजीनामा द्यावा लागला होता.

Visit : policenama.com