चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल, म्हणाले – ‘ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; CM ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यातील जनता महाविकास आघाडीला वैतागली असून या सरकारबद्दलचा संताप पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत व्यक्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पाटील यांनी भाजपाचे विजयी उमेदवार समाधान आवताडे यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले असून मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट झाली. महाविकास आघाडी सरकारवरील लोकांचा विश्वास उडाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत, हे या पोटनिवडणुकीतील जनतेच्या कौलावरून दिसून आल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

पाटील म्हणाले की, लोकांच्या मनात आघाडी सरकारबद्दल प्रचंड राग आहे. संधी मिळेल तिथे लोक व्यक्त करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतही साडेचौदा हजार पैकी 6 हजार ग्रामपंचायतीत भाजपाला विजय मिळाला आहे. विज कनेक्शन तोडणे, विविध नुकसानभरपाई खात्यात जमा केली नाही, शेतकऱ्यांना मदत नाही, पीकविम्याचा लाभ नाही, कोरोनाच्या काळात हातावर पोट असलेल्या असणाऱ्यांना पॅकेज नाही, जे तुटपुंजे पॅकेज दिले त्याची अंमलबजावणी नाही आदी अनेक प्रश्नांनी लोक हैराण झाले आहेत. तसेच आमदार प्रशांत परिचारक आणि उमेश परिचारक यांनी एकदिलाने भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांना साथ दिली, त्यामुळे विजय मिळण्यास हातभार लागला. या विजयाबद्दल आपण परिचारक यांचेही अभिनंदन करतो, असे त्यांनी नमूद केले.