मुलांचा खून करणाऱ्या आरोपी बापाची पोलिसांकडे कबुली

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – दोन मुलांना सावखेडगंगा (ता. वैजापूर) येथील विहिरीत ढकलून खून करणाऱ्या बापाला औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखा व वीरगाव पोलिसांच्या पथकाने अटक केली. संतोष कचरू वाळुंजे (४०) असे आरोपीचे नाव असून, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, चौकशीत त्याने पत्नीसोबत असलेल्या वादातून खून केल्याची कबुली दिली.

वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा शिवारात शनिवारी बापूसाहेब पवार यांच्या शेतातील विहिरीत तीन ते पाच वर्षे वयोगटातील दोन मुलांचे मृतदेह आढळून आले होते. याप्रकरणी वीरगाव पोलिसांनी देवगाव रंगारी व कन्नड तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील हॉटेलांची तपासणी केली.

त्यावेळी संतोष हा गल्लेबोरगाव येथील हॉटेल गणराजमध्ये कामाला असून, तो पाच सहा दिवसांपासून कामावर नसल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी शिताफीने संतोषला ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेमध्ये त्याची विचारपूस केली असता सततची घरगुती भांडणे, पैसा नसणे आदी कारणांमुळे मुलांना विहिरीत ढकलून मारल्याची कबुली दिली. त्यावरून वीरगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खून व पुरावा लपवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.