काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी जवानांचे फ्लॅट लाटले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चव्हाणांवर घणाघात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी बांधलेल्या आदर्श सोसायटीत झालेल्या घोटाळ्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. देशाच्या जवानांना दिलेले फ्लॅट देखील आघाडी सरकारमधील नेत्यांनी खाऊन टाकले अशी टीका मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता केली.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील देगलूर येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले देशातील लोकसभेची ही निवडणूक राष्ट्राच्या अस्मियतेची असल्याचे सांगून त्यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला.
अशोक चव्हाण तुम्ही देखील काँग्रेसच्या काळात मुख्यमंत्री होता. त्यावेळी आपल्या नेतृत्वाला सांगायची तुमच्यात हिंम्मत होती का असा सवाल करत काँग्रेस सरकारने काही केले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचे सरकार असताना रोज बॉम्ब स्फोट होत होते. पण त्यांच्यामध्ये मुकाबला करण्याची हिंम्मत नव्हती. २०१४ मध्ये देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले आणि परिस्थिती बदलली. पाकिस्तानने २०१६ साली उरीमध्ये आपल्या जवानांना मारले. त्यावेळी पाकिस्तानला वाटले हे जुने सरकार आहे. ते फक्त आपला निषेध करतील. मात्र, तसे घडले नाही. सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.