‘कोरोना लस’ हा लाल किल्ल्यासाठीचा आटापिटा आहे का ? : पृथ्वीराज चव्हाण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक २२,७७१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात आता कोरोना संसर्ग लसीवरील संशोधन लवकरात लवकर संपवून स्वातंत्र दिनापर्यंत (१५ ऑगस्ट) लस सर्वत्र उपलब्ध करण्याचा अट्टहास केंद्र सरकार आणि भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (आयसीएमआर) करत असल्याचे उघड झाले आहे. त्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खरमरीत टीका केली आहे.

आयसीएमआर कडून जारी करण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे की, कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक लस तयार करण्याचा देशाचा हा पहिला महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्या चाचण्यांचे निष्कर्ष काय येतात याकडे केंद्र सरकारचे लक्ष आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या माणसावर चाचण्या करण्याच्या कामात सहभागी असलेल्या १२ संस्थांनी आपले प्रकल्प ७ जुलैपासून सुरू करावेत. येत्या १५ ऑगस्टपर्यंत ही लस उपलब्ध करुन देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असे या संस्थाना कळवण्यात आलं होते. दरम्यान, या घोषणेवरुन चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलं की, कोविड-१९ साठी लस १५ ऑगस्ट पर्यंत तयार होईल हा आयसीएमआरचा दावा अवास्तव आहे. लॉकडाऊन च्या गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरुन एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापिटा आहे का? आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे,” असं चव्हाण म्हणाले.