राहुल गांधी लोकसभेत म्हणाले – ‘लिहून घ्या, शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही’

दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले, शेतकरी हा देशाच्या पाठिचा कणा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा कणाच मोडण्याचा घाट घातला आहे. मी आजही लिहून देतो की कृषी कायदे रद्द केल्याशिवाय शेतकरी एक इंचही मागे हटणार नाहीत. मोदींना कृषी कायदे रद्द करावेच लागतील,असं विधान राहुल गांधी यांनी केलं आहे.

तसेच दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलकांमध्ये आतापर्यंत अनेकांचा जीव गेला याबाबत मोदी सरकार भावनाशून्य असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी केंद्रावर जोरदार टीका केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघं देशातील दोन बड्या उद्योगपतींसाठी देश चालवत असल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. “देश फक्त हम दो आणि हमारे दो यांच्यासाठीच चालवलं जात आहे. यात हम दो आणि हमारे दोन कोण आहेत हे आता संपूर्ण देशाला माहित झालं आहे. हे फक्त शेतकऱ्यांचं आंदोलन आहे असं जर तुम्ही समजत असाल तर ही मोठी चूक आहे. हे शेतकऱ्यांचं नाही, तर संपूर्ण देशाचं आंदोलन आहे. असेही ते म्हणाले.

कृषी कायद्याबाबत राहुल गांधी काय म्हणाले?
केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ नव्या कृषी कायद्यांसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, पहिल्या कायद्यात कडधान्य, फळे, भाज्या कुठेही आणि कितीही खरेदी करण्याची मुभा आहे. यामुळे जर कोणत्याही नियंत्रणाशिवाय खरेदी केली गेली तर मंडीमध्ये काय येईल? मंड्या संपविण्याचे हे कारस्थान आहे. असे त्यांनी म्हटलं. तर दुसऱ्या कायद्यात मोठ्या व्यावसायिकांना हेच अन्नधान्य त्यांना हवे तेवढे साठविण्याची मुभा देण्यात आलीय. यामुळे दुसरा कायदा हा अत्यावश्यक वस्तू कायदा संपविणारा असून साठेबजी वाढेल. तसेच तिसऱ्या कायद्यात त्यांनी सांगितलं, शेतकऱ्यांच्या पाठिचा कणाच मोडून टाकल्याचं विधान केलं. यामध्ये जेव्हा शेतकरी या उद्योजकांकडे शेतमालाला जास्त किंमत मागतील तेव्हा त्यांना न्यायालयात जाण्याची परवानगीच नसेल. यामुळे शेतकरी रस्त्यावर येईल, अशी टीका राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली आहे.