लढण्यापूर्वीच काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांनी सोडलं मैदान ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून देशासह राज्यातही काही उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. मात्र महाराष्ट्रात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या संजय निरुपम, अशोक चव्हाण आणि राजिव सातव यांच्या नावाचा उल्लेख मात्र केला गेला नाही. दरम्यान काँगेसकडून ही नाव जाहीर नाहीत, त्यामुळे या तीनही दिग्गजांची नावं कधी घोषित करणार ? एवढेच नाही तर काँग्रेसच्या या नेत्यांनी लढण्यापूर्वीच मैदान सोडले की काय ? याबाबत चर्चा रंगताना दिसत आहे.

काँग्रेसचे हे तीन उमेदवार वेटिंगवर का ?

एकीकडे सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. असे असताना दुसरीकडे काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना अद्याप उमेदवारी का देण्यात आली नाही याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम लोकसभेच्या मैदानात उतरणार की नाही यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. तर, राजीव सातव हे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. त्यांच्यावर गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबतचा निर्णय राहुल गांधी यांच्यावरती सोपवला आहे. पण, अद्याप देखील याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. या सर्व घडामोडी पाहता या तीन दिग्गजांना काँग्रेस मैदानात उतरवणार की नाही? हे पाहावं लागणार आहे.

नांदेडमध्ये भाजपचं अशोक चव्हाणांना आव्हान

नांदेडमध्ये काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तर भाजपने देखील याठिकाणी तगडा उमेदवार देऊन नांदेडचा गड जिंकण्याचे ठरवले आहे. त्यासाठी भाजपकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अशोक चव्हाण यांच्याविरोधात नांदेडमधून उमेदवारी देण्यात आली आहे.