कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय ! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यानं आता कोरोनासंदर्भात कडक निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. याबाबत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनां भेटणार असून, या बैठकीत कोरोनासंदर्भात कठोर निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. यावेळी अजित पवार हे औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात कोरोनाची मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, कोरोनावर कोणीही राजकारण करू नये, तसेच, कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि नागरिक मास्क वापरत नाहीत. हे अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशारा अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना दिला आहे. तसेच कोरोना पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना नियमावली लावली पाहिजे, मी मुंबईला गेल्यानंतर राज्य प्रमुखांशी बोलून तातडीने निर्णय घेऊ, असंही अजित पवारांनी सांगितलंय.

दरम्यान, शिवजयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहीजण शिवजयंतीला बंधन का आणता अशी टीका त्यांनी केली आहे. पण कोरोना वाढतोय, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. तसेच १५ हजार कोटी मराठवाड्यात वीजबिल थकबाकी आहे, राहिलेलं वीजबिल शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने दिलं पाहिजे. शेतकरी अडचणीत आहे, पण सरकारने मदतही केली आहे, त्यामुळे वीजबिल भरलं गेलं पाहिजे, यातही काहीजण राजकारण करत आहेत. पण तरीही यावर काही मार्ग निघतो का याबाबत आम्ही निर्णय घेऊ असे अजित पवार यांनी सांगितले आहे.