15 एप्रिलपासून बाहेर पडण्याची ‘मुभा’ मिळाली तरी या असू शकतात ‘अटी’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता, जो येत्या १४ एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र, हा लॉकडाऊन संपल्यानंतरही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर कसे नियंत्रण मिळविता येईल, याचा विचार केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे. दरम्यान, माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन जरी संपलं असलं तरी नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष मंत्रिमंडळ गटाची एक बैठक मंगळवारी पार पडली. ज्यात गाड्यांसाठी ऑड-इव्हन लागू करण्याविषयी आणि सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये लोकांची संख्या निश्चित करण्यासारखे अनेक पर्याय सूचवले गेले. सोबतच प्रवासा दरम्यान कारमधील संख्येवर मर्यादा येऊ शकते. मॉल आणि शाळा १५ मेपर्यंत बंद राहणार असून धर्मस्थळांवर बंदी कायम ठेवण्याचा सूचनाही या मंत्रिमंडळ गटानं दिल्या आहेत.

यात १३ राज्यांतील ६० जिल्हे हे कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरविले आहेत, ते १४ एप्रिलनंतरही कमीत कमी दोन आठवड्यांकरता पूर्णत: लॉकडाऊन राहतील, यासंदर्भात शिफारस सरकारकडे करण्यात आली आहे. मात्र, राज्यांच्या सीमा १४ एप्रिलनंतरही खुल्या होणार नाहीत. याशिवाय रेल्वे, मेट्रो आणि विमान प्रवासही लवकर सुरू होणार नसल्याचं दिसून येत आहे. मात्र, मेडिकल, किराणा स्टोअर्स सारख्या काही गरजेच्या गोष्टींची दुकानं सुरू करण्यासाठी सूट मिळण्याची शक्यता आहे. परंतु, यादरम्यान कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणं आणि शहरांसाठी वेगळे नियम असणार आहेत.

दरम्यान, केंद्र सरकार २१ दिवसांचा लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याच्या आवशक्यतेवर विचार करत आहे. राज्य सरकार आणि तज्ज्ञ केंद्राला अनेक शिफारसी पाठवत आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, पंजाब आणि मध्य प्रदेशच्या सर्व सरकारांनी लॉकडाऊन वाढविण्याच्या निर्णयाचे समर्थन केल आहे. यासंबंधित अंतिम निर्णय १४ एप्रिलपूर्वी घेतला जाणार असल्याचे समजते. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहे, मात्र, सद्य परिस्थितीतून बाहेर पडण्याची आवश्यकता असल्याची जाणीव सरकारला आहे.