ह्यांच्या जेवणाचा खर्चही केंद्र सरकारनेच करावा, राज्यातील मंत्र्यांवर भाजपाचा निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पालघरमधील साधूंच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा, या मागणीसाठी भाजपा आमदार राम कदम यांच्याकडून खारपासून ते गडचिंचले गावापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. राम कदम यांना ताब्यात घेतला त्यानंतर राम कदम यांची सुटका करण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री भाजपा नेते नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी खार पोलीस स्टेशनला जाऊन राम यांची भेट घेतली.

माजी मुख्यमंत्री भाजपा नेते नारायण राणे यांची सरकारवर टीका
उद्धव ठाकरे हे भाजपाशी गद्दारी करून मुख्यमंत्रिपदावर बसले. हिंदू धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केला. मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात काहीच केलं नाही. पिंजऱ्यात बसून राहतात. त्यामुळे राम कदम यांना आंदोलन करावं लागतं. दोन ते बारा दिवस होऊनही पालघरचा तपास पूर्ण होत नाही, याला विरोध करण्यासाठी भाजप राम कदम यांनी जनआक्रोश मोर्चा काढला. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व सोडलं. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार. कुठल्याही परीक्षेला बसत नाही. पास नाही, त्यामुळे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही असं शिवसेना नेते कायम म्हणतात. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष नाही. उद्धव ठाकरे हिंदुत्व विचारसरणीचे नाही. पदासाठी तडजोड करणारे आहेत. त्यामुळे शिवसेना हिंदुत्व असं समीकरण नाही.

केंद्राने निधी दिला नाही. केंद्राकडे पैसे बाकी आहेत. राज्य सरकार प्रत्येक मंत्री केंद्र सरकारकडे आर्थिक मदत मागतोय आणि मदत मिळाली नाही तर टीका करत थोडक्यात या सरकारची अवस्था “नाचता येईना अंगण अंगण वाकडे’ अशी झाली. आगामी काळात हेच मंत्री स्वतःच्या जेवणाचा खर्च केंद्राने द्यावा, अशी मागणी करतील.

राम कदम यांची सरकारवर टीका
महाराष्ट्र सरकार धृतराष्ट्रच्या भूमिकेत आहेत. पालघरमध्ये साधूंच्या हत्येला किती दिवस झाले तरी कारवाई नाही. हत्येवेळी राष्ट्रवादीचे काही नेते उपस्थित होते. घटनेच्या चौकशीच्या आधीच महाराष्ट्र सरकारने माॅब लिचिंग असल्याचं सांगून टाकलं. सरकारला हा तपास सीबीआयकडे सोपवावा लागेल. महाराष्ट्राची भूमी संतांची आहे. या ठिकाणी संतांवर अन्याय सहन करणार नाही हे सरकारनं लक्षात ठेवावं.