गणेश मूर्तीच्या उंची संदर्भात CM ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्या कोरोना प्रादुर्भाव असल्याने आत्तापर्यंतचे सर्व सण साधेपणाने साजरे करण्यात आले. मात्र येऊ घातलेल्या गणेशोत्सवाबाबत सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मोठ्या गणेश मंडळांशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांसोबत चर्चा केली. यानंतर आज त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करूया.

श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. मूर्ती 4 फूटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कोणीही कोठेही गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा करायचा असा प्रश्न गणेश मंडळांना पडला होता. यंदाचा गणेशोत्सव आपण सर्वजण नियम पाळून, साधेपणाने करू यात. श्री गणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर श्रीगणेशावरील भक्ती महत्त्वाची आहे. मूर्ती 4 फूटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळता गर्दी करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रात संकट आले आहे. त्या संकटापासून धर्म, परंपरा, संस्कृतीही सुटलेली नाही. गर्दी टाळण्यासाठी देशभरातील सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत. हे क्लेशदायक असले तरी मनुष्यहानी टाळण्यासाठी याशिवाय दुसरा उपाय आज नाही. आता सणांचा राजा गणेशोत्सव येत आहे. गणेशोत्सवाची एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राने जपली आहे. मुंबई-पुण्यातील भव्य गणेश मूर्ती, देखावे जगाचे आकर्षण ठरते. ते पाहण्यासाठी 11 दिवस प्रचंड गर्दी होत असते. निदान या वर्षी तरी आपल्याला हे सर्व टाळावे.

ते पुढे म्हणाले की, मुंबईसह राज्यातील गणेश मंडळांशी माझी चर्चा झाली असून शिस्तीचे व सामाजिक भान ठेवून उत्सव करावा यावर एकमत झाले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. गणरायाचे आगमन घरी होईल तसे सार्वजनिक उत्सवी मंडपातही होईल. गणराय येताना महाराष्ट्रासाठी आशीर्वाद, सुरक्षा कवच घेऊनच येतील. पण भव्य मूर्तीऐवजी चार फूटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना करण्याबाबत एकमत झाले आहे.

तसेच मूर्तीमुळे गणेशाचे आगमन आणि विसर्जन प्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते यंदाच्यावेळी टाळावे लागले. गणरायाचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होईल. मंडप देखील लहान आणि साधेच पण सुंदर असावेत याची काळजी घ्या. उत्सवास भीतीचे गलबोट लागणार नाही यासाठी गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी चर्चा करून ठरवले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले