राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय ! शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – देशात कोरोना संसर्गाच्या पार्श्ववभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या हिताचा एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षात शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नसल्याचा अध्यादेश शिक्षण विभागाने काढला आहे. शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेऊन पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

राज्यातील कोणत्याही शाळांनी फी भरण्यासाठी विद्यार्थी पालकांना सक्ती करू नये. त्या ऐवजी मासिक किंवा त्रैमासिक पद्धतीने फी भरण्याचा पर्याय पालकांना देण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहे. पालकांनी फी वाढीबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने कोरोना संसर्गाला जागतिक महामारी घोषित करण्यात आलं आहे. या आजाराच्या संसर्गाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी राज्यात साथीचे रोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अंमलबजावणी सुरु आहे. त्यात राज्यात लॉकडाऊन देखील सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये शैक्षणिक संस्था, शाळांनी विद्यार्थी आणि पालकांना फीस भरण्याची सक्ती करता येणार नाही. काही शाळा पालकांना फी भरण्यासाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार, सर्व व्यवस्थापनच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू शैक्षणिक वर्षाची आणि आगामी वर्षाची फी जमा करण्यासाठी सक्ती करू नये, असे निर्देश देण्यात आले आहे.

तर दहावी-बारावीचे राहिलेल्या परीक्षा १ जुलै पासून घेण्यात येणार असल्याची घोषणा CBSE ने जाहीर केली आहे. कोरोना संसर्ग प्रसार पाहता परीक्षां थांबवण्यात आल्या होत्या. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्धवट राहिल्याने विद्यार्थी हवालदिल झालेले होते. परीक्षा होणार की नाही याबाबत शंका त्यांच्या मनात होती. त्यामुळे मनुष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जुलै च्या पहिल्या आठवड्यात या परीक्षा घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तसेच दहावी आणि बारावीच्या कोणत्या विषयांचे पेपर कधी असतील याबाबतीत सविस्तर वेळापत्रक CBSE लवकरच जाहीर करेल.

दरम्यान, महाराष्ट्र्र राज्य बोर्डाची बारावीची परीक्षा कोरोना संसर्गाचे संकट येण्याआधीच पूर्ण झाली. पण दहावीची परीक्षा मात्र पूर्ण होऊ शकली नव्हती. एक पेपर राहिलेला असतानाच लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने दहावीचा भूगोलचा पेपर राहिला होता. पण राज्य बोर्डाने भूगोलाची परीक्षा पुन्हा घेणार नसल्याचं आधीच जाहीर केलं होता. हा पेपर आता होणार नसून इतर विषयांच्या गुणांवरून सरासरी गुण दिले जातील.