Sanjay Kakde : ‘शरद पवारांनाही मराठा आरक्षण देता आले नाही, ते फडणवीसांनी दिले होते, पण….’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. काकडे म्हणाले की, मराठा आरक्षणाची मागणी 1985 पासून केली जात आहे. तेंव्हापासून आजवर झालेल्या मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याची धमक दाखविली नाही. 3 वेळा मुख्यमंत्री झालेले अन् 50 वर्षांची राजकीय कारकीर्द असलेल्या शरद पवारांना देखील आरक्षण देता आले नाही. ते आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी देण्याची हिम्मत दाखविली. ते सुद्धा ठाकरे सरकारला टिकवता आले नाही. त्यामुळे आगामी काळात आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमके काय करणार आहात असा सवाल संजय काकडे यांनी केला आहे.

संजय काकडे यांची नुकतीच भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काकडे म्हणाले, मुख्यमंत्री मुंबईचे आणि उपमुख्यमंत्री पुण्याचे तरीही याच दोन शहरात कोरोनाचा संसर्ग का वाढला, हे नेते फक्त सभागृहात बसून बैठका घेतात. बाहेर पडत नाहीत. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलेला असतानाही त्या अनुषंगाने तयारी नाही. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. प्रत्येकजण वेगवेगळ्या घोषणा करत असतो. पहिल्या लाटेत एवढा आकडा वाढला नव्हता. यावेळी ग्रामीण भागातही संसर्ग वाढला आहे. राज्य शासनाने ठरवले तर 7 ते 8 हजार कोटी कोरोनावर खर्च करू शकतात. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी घरातून बाहेर पडावे, लोकांमध्ये फिरावे त्यावेळी खरी परिस्थिती समजेल. प्रत्येक गोष्टीला केंद्र सरकारला जबाबदार धरता. मग राज्याची काही जबाबदारी आहे का नाही असा सवालही काकडे यांनी उपस्थित केला आहे.