… तर तो देशासोबत अन् शेतकर्‍यांसोबत सर्वांत मोठा विश्वासघात ठरेल; राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर ‘हल्लाबोल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने लादलेले काळे कृषी कायदे रद्द केले नाहीत आणि त्यापेक्षा इतर काही गोष्टींवर तडजोड झाली तर तो देशासोबत आणि शेतकऱ्यांसोबत सर्वांत मोठा विश्वासघात ठरेल, असे ट्विट करत काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार असे सांगितले गेले होते. पण मित्रांचे उत्पन्न चौपट केले आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न अर्धे होणार. खोटं बोलणार, लूटणार आणि सूट-बूटवाले हे सरकार असल्याचा घणाघातही गांधी यांनी केला आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक व्हिडिओदेखील त्यांनी शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकार व शेतकरी नेत्यांची बैठक झाली. या पार्श्वभूमीवर गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

शेतक-यांना पुढे करून चीन आणि पाकिस्तानचा भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, मोदी काही कमजोर नेते नाहीत. त्यांना आता जनतेचे समर्थन मिळालेले आहे. कृषी कायदे लागू केल्यानंतरही जनतेने त्यांना मोठा पाठिंबा दिला होता. शेतकरी रस्त्यावर आले तर यासंदर्भातील निर्णय संसदेत घ्यायचा की रस्त्यावर? असा सवाल हरियाणाचे कृषिमंत्री जे. पी. दलाल यांनी उपस्थित केला आहे.

देशभरात जिल्हाधिका-यांना निवेदन

केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. केंद्र सरकारचे मंत्री शेतकऱ्यांची चर्चा करताना एक भूमिका घेतात आणि दुसरीकडे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये फूट कशी पाडता येईल, याचेही डावपेच आखतात हे संतापजनक असून, गुरुवारी देशभरातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन देण्यात येईल, असे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी बुधवारी स्पष्ट केले.

आंदोलनकर्त्या शेतक-यांची होणार कोरोना चाचणी

सोनीपतचे जिल्हादंडाधिकारी श्यामलाल पुनिया यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनात ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांपैकी अंगात ताप असलेल्या शेतकऱ्यांची एक यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ताप असणाऱ्या शेतकऱ्यांची मोफत कोरोना चाचणी केली जाणार आहे. जर एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्यास अशा शेतकऱ्यांना मोफत सोयी-सुविधा आणि उपचार देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या संकटात आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र जमले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. आंदोलक करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोना चाचणीसाठी तयार करणे हेदेखील प्रशासनासमोर एक मोठे आव्हान आहे.