मंगळवारी (दि. १२) आदित्य ठाकरे यांनी मोहोळ तालुक्याचा धावता दौरा केला. यावेळी त्यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी आणि जनतेशी संवाद साधला. सारोळे येथे शिवसेनेच्या वतीने ग्रामस्थांना पाण्याच्या टाक्या व पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. यावेळी येथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. याआधी त्यांनी पोखरापूर तलावाला भेट देऊन पाहणी करुन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बाेलत असताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना आदित्य म्हणाले की, “शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेल्या शिकवणी प्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुनच मी दुष्काळग्रस्त जनतेशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर आलो आहे. निवडणुका येतील जातील मात्र अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. तुम्ही मत कोणत्याही पक्षाला द्या, पण संकटाच्या काळात शिवसेना तुमच्या सोबत सदैव राहील” असा विश्वास आदित्य यांनी शेतकऱ्यांना दिला.
यावेळी मंचावर उस्मानाबादचे खा. रविंद्र गायकवाड, जेष्ठ नेते दिपक गायकवाड, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, उप जिल्हाप्रमुख दादासाहेब पवार, विधानसभा संघटक काकासाहेब देशमुख, तालुकाप्रमुख अशोक भोसले, अस्मीता गायकवाड, जि.प. सदस्या शैलाताई गोडसे, नगरसेविका सीमाताई पाटील, सत्यवान देशमुख, मनोज शेजवाल, उप तालुका प्रमुख नागेश वनकळसे, महेश देशमुख, उपजिल्हा प्रमुख चरण चवरे, हरिभाऊ करंडे, विक्रम देशमुख, आण्णा देशमुख, शहरप्रमुख रणजित गायकवाड, अजय देशमुख, सचिन गायकवाड, बाळासाहेब वाघमोडे, मंगळवेढा तालुका संघटक विजय कलुबर्मे आदी उपस्थित होते.
आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोहोळ तालुक्यातील पोखरापूर आणि सारोळे या दोन गावांचा दुष्काळ पाहणी दौरा केला. त्यांचा हा दौरा खऱ्या अर्थाने धावता दौरा ठरला. कारण त्यांनी त्यांचा हा दौरा केवळ ९ मिनिटात उरकला. त्यांच्या धावत्या दौऱ्याबाबत तेथील भागातील जनतेनेही तो दौरा धावता ठरल्याचे सांगतिले आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांस भेट देण्यास विसरले
शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत आदित्य ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं मात्र नापिकी आणि कांद्याला दर न मिळाल्याने आपल्या गळ्याला दोरी लावून जीवन यात्रा संपविणाऱ्या म्हाळाप्पा हरिबा मोटे (रा. दाईंगडेवाडी ता. मोहोळ) या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन करण्यास ठाकरे विसरले. याबाबतही तेथील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचा हेतू साध्य होऊ शकला नसल्याचे सांगितले.