राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत पहिल्यांदाच घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळी भागात सुरू केलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे. चारा छावण्यांची बिले देण्यास विलंब करू नये, चारा छावण्यांच्या ठिकाणी तात्पुरते स्वच्छतागृहे सुरू करण्याचे निर्देशही चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

दुष्काळावरील उपाययोजना करण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, मंत्री महादेव जानकर, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विविध विभागांचे अपर मुख्य, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. यासंदर्भात माहिती देण्यासाठी मंत्रालयात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यात सध्या ६२०९ टॅंकर्सच्या माध्यमातून ४९२० गावे आणि १० हजार ५०६ पाड्यांवर पाणी पुरवठा केला जात आहे. राज्यात नाशिक, पुणे, औरंगाबाद विभागात एकूण १५०१ चारा छावण्या सुरू आहेत. त्यामध्ये सुमारे १० लाख ४ हजार ६८४ जनावरे आहेत. आतापर्यंत चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तांना १११ कोटी, पुणे चार आणि नाशिक विभागीय आयुक्तांना ४७ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

राज्यात लहान व मोठ्या जनावरांसाठी छावण्या आहेत मात्र शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात प्रथमच छावण्या सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी आता पर्यंत ३४ लाख शेतकऱ्यांना २२०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली.