सगळं काही ऑनलाइन, मग शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन का ? पंकजा मुंडेंचा सवाल

पोलिसनामा ऑनलाइन: कोरोनामुळे महाराष्ट्रातील सर्व शिक्षण संस्था आणि कॉलेज बंद आहेत. अशातच शिक्षकांच्या कळीचा मुद्दा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी उचलला आहे, तो म्हणजे ‘बदल्यांचा’. शिक्षकांच्या बदल्या आणि त्यात सध्या होत असलेला गोंधळावर पंकजा मुंडेंनी भाष्य केले आहे. सध्या सगळी कामे ऑनलाइन चालू असताना शिक्षकांच्या बदल्याच का ऑफलाइन होत आहेत, असा प्रश्न मुंडेंनी राज्य सरकारला विचारला आहे. याबद्दल जाब विचारण्याचे आवाहन त्यांनी मराठवाड्यातील शिक्षकांशी संवाद साधताना केले. सरकारच्या ऑफलाइन बदलीच्या निर्णयावर नाराज असणाऱ्या शिक्षकांना यामुळे बळ मिळाले आहे. तसेच उपस्थित शिक्षक प्रतिनिधींनीही शासनाच्या या धोरणाबद्दल विरोध दर्शविला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे स्थायी समितीचे चेअरमन रमेश पोकळे यांनी मराठवाड्यातील शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पंकजा मुंडे बोलत होत्या. हा सगळा संवाद ऑनलाईन पद्धतीने झाला. यावेळी मराठवाड्यातील आमदार माजी मंत्री, बबनराव लोणीकर, आमदार सुरेश धस, आमदार तानाजी मुटकूळे, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार सौतोष दानवे, आमदार मेघनाताई बोर्डीकर तसेच माजी आमदार गोविंद केंद्रे, देविदास राठोड हे सहभागी झाले होते.

सरकारचा हा निर्णय खूप अचंबित करणारा आणि हास्यास्पद आहे. तसेच हा निर्णय म्हणजे ‘खाली डोकं वर पाय’ आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. सध्याच्या सगळ्या बदल्या ऑनलाइनच असाव्यात अशी शिक्षकांबरोबरच माझीही इच्छा आहे, असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना शिक्षक हे लाभाचं पद नाही, भावी पिढी घडवण्याचे काम ते करतात. त्यामुळे त्यांना मनासारख्या नेमणुका मिळाल्याच हव्यात. मुळात यासाठी राज्याचं रोस्टर करण्याची गरज आहे. दुर्गम भागाची व्याख्या व्हायला हवी .तसेच दिव्यांगांचे प्रमाणपत्रही तपासावे, असे त्या म्हणाल्या.

या शिक्षकांच्या ऑफलाइन बदल्यांच्या मागणीसाठी पंकजा मुंडेंनी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना निवेदनं दिली आहेत. सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा नाहीतर आम्ही हा निर्णय बदलण्यास भाग पाडू, असा इशाराही पंकजा मुंडेंनी दिला आहे. आम्ही सत्तेत असताना असले निर्णय सगळयांना विचारात घेऊन घेतले होते, परंतु विद्यमान सरकारने मात्र ऑफलाईनचा निर्णय कशासाठी घेतलाय? असा प्रश्नही मुंडेंनी केला आहे.