खळबळजनक ! 2 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या

नांदगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  नांदगावच्या वाखारी येथील २ बालकांसह एकाच कुटूंबातील ४ जणांच्या हत्या करणाऱ्या आरोपींना शोधण्यास पोलिसांना अपयश आलं आहे. त्यावरुन संतप्त झालेल्या वाखारी गावच्या गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरुन धरणे आंदोलन करत निदर्शने केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या वाखारी जेऊर येथे ६ ऑगस्ट रोजी २ चिमुकल्यांसह चौघांची हत्या करण्यात आली होती. चोरीच्या उद्देशातून ही हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. पण अधिकृत माहिती अद्यापही समोर आली नाही. समाधान अण्णा चव्हाण (वय ३७), भरताबाई चव्हाण (वय ३२), मुलगा गणेश (वय ६), मुलगी आरोही (वय ४) अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहे. झोपेत असतानाच समाधान यांचा गळा चिरण्यात आला होता.

दरम्यान, सदरील घटनेला २२ दिवस उलटून गेली असली तरी पोलिसांना आरोपीस शोधण्यात अपयश आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी वाखारी परिसरातील संतप्त गावकरी रस्त्यावर उतरले. गावकऱ्यांनी धरणे आंदोलन करुन निदर्शने केली. या आंदोलनात शिवसेना आमदार सुहास कांदे सहभागी झाले होते. हत्याकांड होऊन २२ दिवसाचा काळ लोटला असला तरी आरोपी अजून मोकाट असल्याने गावकरी संतप्त झाले. ७ दिवसांत आरोपींना पकडण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपींसंदर्भात सर्व धागे दोरे हाती हाती लागले असून, आरोपींना लवकरच गजाआड करण्यात येईल, अशी माहिती मनमाडचे डीवायएसपी समिरसिंग साळवे यांनी दिली.