‘परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले? हे षडयंत्र, अब्रुनुकसानीचा खटला भरणार’

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पदावरून उचलबांगडी झाल्याच्या नाराजीतून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी गोळा करण्याचे आदेश गृहमंत्री देशमुख यांनी दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. हे पत्र सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही दिले आहे.

या पत्रात परमबीर सिंग यांनी इतरही काही अतिशय गंभीर आरोप केले आहेत, गृहमंत्री देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख पत्रात नमूद आहे. या पत्रातील मजकूर बाहेर आल्यानंतर राज्यात मोठा गदारोळ उडाला आहे. एका बड्या पोलीस अधिकार्‍याने अशाप्रकारे आरोप करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या आरोपांमुळे अनिल देशमुख अडचणीत आले असले तरी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडण ट्विट करून तसेच एक प्रसिद्धीपत्रक जारी करून केले आहे.

मात्र, याप्रकरणी भाजपा चांगलीच आक्रमक झाली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घेवून कसून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून एक प्रसिद्धीपत्रक काढून सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखला करणार असल्याचे म्हटले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रसिद्धीपत्रक पुढील प्रमाणे –

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री. परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून श्री. परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल.

– सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ?

– आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर श्री. परमबीर सिंग यांनी दिनांक 16 मार्च ला एसीपी श्री. पाटील यांना व्हॉटसअप चॅटवरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून श्री. परमबीर सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना श्री. परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?

– 18 मार्च रोजी मी एका दैनिकाच्या कार्यक्रमामध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअपवर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.

– पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.

– परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे.

– स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.

– सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?

– विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.

– स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे

– मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी.