पुण्यात उद्या तब्बल ५०० ठिकाणी मोदींची ‘मन की बात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेली साडेचार वर्ष प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी देशवासियांबरोबर मन की बात करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या पंचवार्षिकमधील रविवारची मन की बात शहरात एकाच वेळी तब्बल ५०० ठिकाणी होणार आहे.

पंतप्रधानपदाची शपत घेतल्या पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमितपणे गेली साडेचार वर्ष प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी देशवासियांबरोबर आकाशवाणीवरून मन की बात करत आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे लोकसभेच्या या पंचवार्षिकमधील त्यांचा हा बहुधा अखेरचा संवाद असेल. कारण पुढील महिन्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या अखेरच्या संवादाचा भाजपाच्या वतीने महोत्सवच आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी बूथ रचनेतील शक्तीकेंद्र प्रमुखांची मदत घेण्यात आली आहे.

दरम्यान, शहरातील तब्बल ५०० ठिकाणी रविवारी मोदींचा आवाज घुमणार आहे. शक्तीकेंद्र प्रमुखाने त्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात एका सभागृहाची, एका रेडिओची, ध्वनीवर्धकाची व्यवस्था करायची आहे. तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना तिथे निमंत्रीत करायचे आहे. सकाळी ११ वाजता मोदींचा संवाद सुरू होईल. तो सर्वांना ऐकू येईल. त्यानंतर उपस्थितांकडून कार्यकर्त्यांनी सुचना जमा करायच्या आहेत. त्यासाठी त्यांना कोरे कागद देण्यात येतील. केंद्र सरकारने आगामी काळात काय करावे, काय होणे गरजेचे आहे, कशाला प्राधान्य द्यावे अशा प्रकारच्या या सुचना आहेत. या सर्व सुचना नंतर भाजपाच्या केंद्रीय जाहीरनामा समितीकडे पाठवण्यात येणार आहेत. खासदार अनिल शिरोळे यांनी तर यासाठी जाहीर कार्यक्रमाचेच आयोजन केले आहे. शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाजवळ असलेल्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान मोदींची मन की बातचे जाहीर प्रसारण होणार आहे.