नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर – गावस्कर चषक कसोटी मालिकेतील शेवटचा सामना गुरुवारपासून सिडनी येथे खेळला जाणार आहे. कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (BCCI) संघाची घोषणा केली आहे. भारताने जाहीर केलेल्या १३ जणांच्या संघामध्ये उमेश यादव, अश्विन, कुलदीप यादव आणि के.एल राहुलला स्थान देण्यात आले. मेलबर्न कसोटीत चांगली कामगिरी करणाऱ्या इशांत शर्माला दुखापतीमुळं संघात स्थान मिळू शकलं नाही. रोहित शर्माने माघार घेतली आहे.
सिडनीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साजेशी असल्यामुळे भारत दोन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सिडनीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी पोषक असल्याने कुलदीपला अंतिम अकरात संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथा कसोटी सामना उद्यापासून सिडनीमध्ये होणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ अशा आघाडीवर आहे. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली तरीही बॉर्डर-गावस्कर चषक हा भारतीय संघाकडेच राहणार आहे. भारतीय संघाने ॲडलेड कसोटी जिंकून मालिका विजयाच्या दिशेने पाऊल टाकले, परंतु पर्थवर यजमानांनी कमबॅक केले. मेलबर्न कसोटीत चेतेश्वर पुजाराचे शतक आणि जसप्रीत बुमराच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर भारताने विजय मिळवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. ३७ वर्षांनंतर भारताने मेलबर्नवर विजय मिळवला, तर ४१ वर्षांत प्रथमच भारताने दोन कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला.