India China Tension : भारताने तैनात केले T-90 भीष्म रणगाडे

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पूर्व लडाखमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत जी स्थिती होती, तशीच ‘जैसे थे’ परिस्थिती कायम करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. पण त्याचवेळी चीनने कुठलीही आगळीक केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. भारतीय लष्कराने गलवान खोर्‍यात 14 हजार फूट उंचीवर सहा टी-90 रणगाडे तैनात केले आहेत. हे रणगाडे क्षेपणास्त्र डागण्यासाठी सुद्धा सक्षम आहेत.

भारत आणि चीनच्या वरिष्ठ सैन्य अधिकार्‍यांमध्ये तणाव कमी करण्यासंदर्भात महत्वाची बैठक होणार आहे. गलवान खोर्‍यात नदी काठाजवळ चीनने ज्या आक्रमक पद्धतीने सैन्याची जमवाजमव करुन शस्त्र सज्जता ठेवली आहे. ती लक्षात घेऊनच भारतीय सैन्याने इतक्या उंचावरील भागात टी-90 भीष्म रणगाडे तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागात उंचावरील क्षेत्रात भारतीय सैन्य महत्त्वाचा ठिकाणी तैनात आहे. पूर्व लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या 1597 किलोमीटरच्या नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्याने युद्ध वाहनांसह 155 एमएम हॉवित्झर तोफाही तैनात केल्या आहेत. चीनच्या कुठल्याही आव्हानाला प्रयुत्तर देण्यासाठी चुशुल सेक्टरमध्ये दोन टँक रेजिमेंट तैनात केल्या आहेत. चीनला एक इंचही भूमी द्यायची नाही. उलट यापुढे चीनची कुठलीही दादागिरी खपवून घ्यायची नाही अशी भारताची भूमिका आहे.