‘PM मोदी, भारताला तोडणारा नेता’ ; आंतरराष्ट्रीय ‘TIME’ मासिकातून मोदींवर जहरी टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय टाइम मासिकानं आशियाच्या आवृत्तीत लोकसभा निवडणुकीवर विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. ‘देशातली सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखी पाच वर्षे देणार का?’ या शीर्षकाखाली टाइमनं हा लेख प्रसिद्ध केला असून यामधून मोदींच्या पाच वर्षांतील कामाचा आढावा घेण्यात आला आहे. मोदींचा उल्लेख मासिकाकडून ‘भारताला तोडणारा प्रमुख’ असा करण्यात आला आहे. यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय मासिक ‘टाइम’नं पंतप्रधान नरेंद्र मोदींना कव्हर पेजवर स्थान दिलं आहे. ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखीन पाच वर्ष देईल का?’ अशा मथळ्याखाली टाइम मासिकाच्या आशिया अवृत्तीमध्ये कव्हरस्टोरी छापण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या कारभारावर टीका करताना मासिकानं नेहरुंचा समाजवाद आणि भारतातली सध्याची सामाजिक परिस्थिती यांची तुलना केली आहे. हिंदू आणि मुस्लिमांमधला बंधूभाव वाढावा यासाठी मोदींनी काहीच केलं नाही, अशी टीका लेखातून करण्यात आली आहे. आतिश तासीर यांनी हा लेख लिहिला आहे. तासीर यांच्या लेखाबरोबरच याच अवृत्तीमध्ये मोदी एक बदल घडवणारा नेता असाही लेख इयन बेरीमेर यांनी लिहिला आहे.

ताहीर यांच्या लेखातील मुद्दे –

तुर्की, ब्राझील, ब्रिटन आणि अमेरिकेप्रमाणेच भारतातही लोकशाही मुल्यांपेक्षा एखाद्याची लोकप्रियता अधिक वाढल्याचे दिसत आहे.

लोकप्रियतेमुळे या आधी दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या बहुसंख्याकांच्या भावनांना वाचा फोडण्याचे काम झाले आहे. मात्र त्याच वेळी यामुळे देशातील वातावरण निकोप व उत्साहवर्धक राहिलेले नाही.

नरेंद्र मोदींनी महान राजकीय व्यक्तीमत्त्वांवर हल्ले चढवले. ते काँग्रेसमुक्त भारताबद्दल बोलतात. त्यांनी कधीही हिंदू-मुस्लिमांचं नातं सुधारावं यासाठी प्रयत्न केले नाहीत. तशी इच्छाशक्ती दाखवली नाही.

काँग्रेस नेतृत्व १९८४ च्या दंगलीतल्या आरोपांपासून मुक्त नाही. मात्र तरीही त्यांनी स्वत:ला उन्मादी गर्दीपासून दूर ठेवलं. पण २००२ मध्ये मुख्यमंत्री असताना मोदी शांत बसले. त्यांचं हेच मौन दंगल घडवणाऱ्यांच्या पथ्यावर पडलं. नरेंद्र मोदी हे २००२ च्या गुजरात दंगलीनंतर शांत राहण्याचा निर्णय घेतल्याने ते एका ठराविक गटाच्या बाजूने झाले.

एक राष्ट्र म्हणून भारताची वैशिष्ट्ये, भारताचे निर्माते, भारतातील अल्पसंख्यांक आणि देशातील संस्थांचा कारभार असं सर्वकाही विस्कळीत पद्धतीने मांडण्यात येत असल्याची टिका लेखकाने केली आहे. ‘स्वतंत्र भारताने मिळवलेल्या सहिष्णुता, उदारमतवादी धोरण, स्वतंत्र प्रसारमाध्यमे यासारख्या गोष्टींही एखाद्या कटाचा भाग असल्याप्रमाणे २०१४ च्या निवडणुकांनंतर भासवले जात आहे.

भारताच्या कथित उदार संस्कृतीची चर्चा केली जाते. मात्र मोदींचं सत्तेत येणं या संस्कृतीत धार्मिक राष्ट्रवाद, मुस्लिमांविरोधातली भावना आणि जातीय कट्टरता किती मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे.