बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या खेळाडूला आयपीएलमध्ये खेळवण्याबाबतचा निर्णय संघ मालकांकडे असतो. काही खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत बीसीसीआय संघमालकांसोबत चर्चा करणार आहे. बुमराहला आयपीएल सामन्यात खेळवायचे असल्यास फक्त निवडक आणि महत्त्वाच्या सामन्यात खेळवण्यात यावे अशी सूचनाही बीसीसीआय संघमालकांना करणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी बुमराहने विश्रांती घेतल्यास संघाच्यादृष्टीने चांगलीच बाब ठरणार असल्याचे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. बुमराहप्रमाणे इतर प्रमुख भारतीय गोलंदाजांनादेखील आयपीएलमध्ये विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर वन डे मालिका आणि न्यूझीलंड दौरा असे भारतीय संघाचे वेळापत्रक आहे. आयपीएल संपल्यानंतर त्वरित वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होत आहेत. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. जसप्रीत बुमराहसोबत, विराट कोहली, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या या खेळाडूंबद्दलही बीसीसीआय अशाच प्रकारचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.