Tripurari Purnima : ‘या’ पध्दतीनं करा त्रिपुरारी पौर्णिमेची पूजा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि मान्यता

पोलीसनामा ऑनलाईन – कार्तिक महिन्याला भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये अन्यन साधारण आणि विशेष महत्व आहे. या महिन्यात प्रामुख्याने लक्ष्मी आणि श्रीविष्णू यांचे पूजन केले जाते. कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. सन 2020 मधील वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हटले जाते. या दिवशी धम्म सेनापती सारिपुत्रज्ञचे परिनिर्वाण झाले होते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी ‘हरिहर भेट’ म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असेही मानले जाते. म्हणून त्यावेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. कार्तिक पौर्णिमेचे पूजन कसे करावे? शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता, परंपरा यांविषयी जाणून घेऊया…

दीपोत्सवानंतर कार्तिक पौर्णिमेला देशातील काही ठिकाणी देवदिवाळी साजरी केली जाते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. कार्तिक पौर्णिमेला बनारसमध्ये संपूर्ण नगरीला दिव्यांनी सुशोभित केले जाते.

कार्तिक पौर्णिमेचा शुभ मुहूर्त
कार्तिक पौर्णिमेला महादेव शिवशंकरांसह लक्ष्मी नारायणाचे पूजन केले जाते. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातो. हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते.
कार्तिक पौर्णिमा- सोमवार, 30 नोव्हेंबर 2020
– पौर्णिमा प्रारंभ- रविवार, 29 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजून 48 मिनिटे
– पौर्णिमा सांगता- सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03 वाजता. भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे कार्तिकी पौर्णिमेचे- पूजन सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 रोजी करावे, असे सांगितले आहे.

कार्तिक पौर्णिमेचा पूजाविधी
कार्तिक पौर्णिमेला देशातील विविध भागात यात्रा भरवल्या जातात. तसेच पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. यानंतर लक्ष्मी नारायणाचे पूजन करावे. लक्ष्मी नारायणाची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा. सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले गेले आहे. सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल, तर सत्यनारायणाची कथा आवर्जुन ऐकावी, असे सांगितले जात आहे. या दिवशी लक्ष्मी नारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी पुन्हा लक्ष्मी नारायणाची आरती करावी. तुळशीचे पूजन आणि आरती करावी असे सांगितले आहे.

दीपदानाला विशेष महत्व
दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही केलेल्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला देवी-देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशिर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते. या दिवशी देवी-देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमायाचना करायची असते. देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशीपाशी आवर्जुन दिवा लावावा, असे सांगितले जाते.

दशावतारापैकी श्रीविष्णूंचा प्रथमावतार
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्रीविष्णूंनी दिवशी प्रथम अवतार धारण केला होता, असे मानले जाते. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. पुराणांनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलायापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता. अठरा पुराणांमध्ये मत्स्यपुराणाचा समावेश आहे. श्रीविष्णूंनी मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला, तो पुढे मत्स्यपुराण म्हणून प्रसिद्ध झाला, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.