‘हे’ आहेत ऑगस्ट महिन्यातील 11 प्रमुख सण-उत्सव, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जुलै महिन्याच्या सुरुवातीला चातुर्मासाला सुरुवात होते. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात चातुर्मासातील पहिल्या श्रावण महिन्याला सुरुवात होते. ऑगस्ट महिन्याच्या पूर्वार्धात श्रावण महिना असून, श्रावणातील अनेक महत्त्वाचे सण-उत्सव, व्रते-वैकल्ये ऑगस्ट महिन्यात साजरी केली जातात. एकंदरीतच श्रावण महिना हा सण-उत्सवांचा महिना असून याला व्रत-वैकल्यांचा राजा मानले जाते. त्यामुळे या महिन्यात उत्सवाचे वातावरण असते. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच रक्षाबंधन असून यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी, भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. या प्रमुख सण-उत्सवांशिवाय आणखी कोणते सण-उत्सव, व्रते ऑगस्ट महिन्यात साजरी केली जाणार आहे, जाणून घेऊयात

शनी प्रदोष, बकरी ईद
श्रावण महिन्यातील शुद्ध त्रयोदशीला शनि प्रदोष व्रत केले जाते. शनिवार 1 ऑगस्ट रोजी शनि प्रदोष आहे. प्रदोषाची तिथी शनिवारी येते, त्यामुळे याला शनि प्रदोष असे म्हटले जाते. प्रदोष व्रतामध्ये महादेव शिवशंकराच्या पूजनाचे महत्त्व मोठे आहे. याच 1 ऑगस्टला मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर बकरी ईद साजरी केली जाते. बकरी ईद त्यागाचे प्रतीक म्हणून साजरी केली जाते.

नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन
श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कोळीबांधव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान मानले जाते. या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. सोमवार 3 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा आहे. त्याचप्रमाणे श्रावण पौर्णिमा ही राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणून साजरी केली जाते. भावा-भहिणींचा हा सण मानला जातो. याच दिवशी महाराष्ट्रात दुसरा श्रावणी सोमवार असून सुमारे 29 वर्षांनी हा अद्भूत योग जुळून आला आहे.

संकष्ट चतुर्थी
गणेश भक्त आणि उपासकांसाठी संकष्ट चतुर्थी हा महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी संकष्ट चतुर्थी आहे. प्रत्येक मराठी महिन्याची वद्य चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. गणपतीचे नामस्मरण करून संकष्ट चतुर्थी व्रत केले जाते. चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातील चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असते. याच दिवशी श्रावणी शुक्रवार असल्याने जिवतीची पूजा किंवा जरा-जिवंतिका पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमी/गोकुळाष्टमी
श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. मंगळवार 11 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाणार आहे. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची जयंती आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळांनी हा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

अजा एकादशी, स्वातंत्र्य दिन
श्रावण महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशी अजा एकादशी नावाने ओळखली जाते. मनोवांच्छित फळ देणारी अजा एकादशीचे व्रत केले जाते. शनिवार 15 ऑगस्ट रोजी अजा एकादशी आहे. याच दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून भारत स्वतंत्र झाला. तसेच पारशी समाजाचे नववर्ष या दिवसापासून सुरु होत आहे. हा दिवस पतेती म्हणून साजरा केला जातो. धार्मिक प्रथा व परंपरेनुसार पारशी धर्मीय हा सण साजरा करतात.

हरितालिका पूजन
महिलांनी आणि कुमारिका हरितालिकेचे व्रत करतात. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हटले जाते. भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. या दिवशी पार्वती देवीची उपासना केली जाते. पतिला दीर्घायुष्य मिळावे यासाठी महिला हे व्रत करतात. तर कुमारीका चांगला जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात. दुसऱ्या दिवसापासून गणेशोत्सव सुरु होतो.

गणेश चतुर्थी
गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धर्मिक व्रत आहे. गणपतीच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते. घरोघरी पार्थिव गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाते. या परंपरेला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक रुप दिलं. शनिवार 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. मात्र, यांदाच्या गणेशोत्सवावर कारोनाचे सावट आहे. अनेक मंडळांनी माघी गणपती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऋषिपंचमी
भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषिपंचमी साजरी करण्यात येते. यंदा 23 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी ऋषींची पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी असे म्हटले जाते. या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. आळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, कोवळा माठ या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. याच दिवशी शेगावचे संत गजानन महाराज यांचा समाधीदिन असतो. दीड दिवसांच्या गणपतीचे या दिवशी विसर्जन केले जाते.

राधाष्टमी
भाद्रपद शुद्ध अष्टमीला राधेचा जन्म झाला असे मानले जाते. त्यामुळे शुद्ध अष्टमीला राधाष्टमी असे म्हटले जाते. मंगळवार 25 ऑगस्ट रोजी ही राधाष्टमी साजरी केली जाणार आहे. श्रीकृष्णाची सखी अशा संदर्भाने राधा भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध पावली आहे. लक्ष्मीचा एक अवतार म्हणूनही वैष्णव संप्रदायात राधेला आदराचे स्थान आहे. पश्चिम बंगाल, मणिपूर, ओरिसा या प्रांतात विशेष पूजन केले जाते. राधा या नावांमध्ये ‘राध’ असा संस्कृत ‘धातू’ आहे, याचा अर्थ ‘प्रसन्न करणे’ असा होतो.

पद्म एकादशी, वामन जयंती
भाद्रपद शुद्ध एकादशी पद्मा एकादशी नावाने साजरी केली जाते. शनिवार 29 ऑगस्ट रोजी पद्मा किंवा परिवर्तिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी वामन जयंती आहे. वामन अवतार हा विष्णूचा दशावतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो. वामन जयंती हा भाद्रपद शुद्ध द्वादशीला असते. श्रीमद् भागवदपुराणात श्रीविष्णूंच्या वामन अवताराविषयी माहिती देण्यात आली आह. यादिवशी श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. मात्र, यंदा एकदाशी आणि वामन जयंती एकाच दिवशी आल्याने हा उत्तम योग मानला जात आहे.

ओणम, मोहरम
दक्षिण भारतातील केरळमध्ये ओणमचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. चिंगम महिन्याच्या शुद्ध पक्षात श्रवण नक्षत्र येईल, या दिवशी ओणम साजरा करतात. रविवार 30 ऑगस्ट रोजी ओणम सण साजरा केला जाणार आहे. शेतात धान्य उगवल्याच्या आनंदात 10 दिवस ओणम सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो ओणमच्या पहिल्या दिवसाला ‘अथम’ आणि शेवटच्या दिवसाला ‘थिरुओणम’ असे म्हटले जाते. थिरुओणम यादिवशी वर्षातून एकदा बळी त्याच्या प्रजेला भेटण्यासाठी पाताळातून धरतीवर अवतरतो अशी मान्यता आहे.