कोरोना हे राष्ट्रीय संकट, विरोधकांनी राजकारण करू नये : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. ‘कोरोना एक राष्ट्रीय संकट आहे. मेडिकल इमर्जन्सी आहे. कोणत्याही विरोधी पक्षाने संपूर्ण विषयाचे राजकारण करू नये. लॉकडाऊन का? कशासाठी? हे प्रश्न चुकीचे आहेत’, असे ते म्हणाले.

राज्यात शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. यासोबतच अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यावरून विरोधी पक्षांकडून मोठा विरोध केला जात आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी यावर वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील विरोधी पक्षाची भूमिका अचानक बदलली आहे. गुजरातमध्ये लॉकडाऊन करा, असे उच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे कुठलेही सरकार आनंदाने लॉकडाऊन करत नाही. ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे. त्यामुळे आम्हाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला आहे.

कोरोना संदर्भात कोणीही राजकारण करू नये. लॉकडाऊन का? कशासाठी? हे प्रश्न चुकीचे आहेत’. दरम्यान, नियम आणि न्याय सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे. मग येडियुरप्पा असो किंवा अनिल देशमुख. अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. आता निर्णय न्यायालय देईल. अनिल देशमुख यांचा मुद्दा न्यायालयात आहे. त्यामुळे मी कोणतेही भाष्य करणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.