पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात संचारबंदीतली पहिली शिक्षा बारामतीत न्यायालयाने दिली असून, बाहेर फिरणाऱ्या तिघांना न्यायालयाने 500 रुपये दंड किंवा 3 दिवस कैद अशी शिक्षा सुनावली आहे. संचारबंदी आदेश मोडल्यानंतर किमान 6 महिने कैदेची शिक्षा होऊ शकते.
अफजल बनिमिया अत्तार (वय 39, रा. श्रीरामनगर, ता. बारामती), चंद्रकुमार जयमंगल शहा (वय 38) आणि अक्षय चंद्रकांत शहा (वय 32, रा.वडगाव निबालकर ) अशी शिक्षा मिळालेल्या तिघांची नावे आहेत.
राज्यात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना बाहेर फिरण्यास बंदी असून, वाहने देखील रस्त्यावर अण्यास बंदी घातली आहे. मात्र तरीही काही जण विनाकारण बाहेर फिरत असताना दिसून आले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून त्यांच्यावर 188 नुसार कारवाईकरून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
बारामती तालुका पोलीसांनी देखील अनेकांवर 188 नुसार कारवाई केली आहे. त्यानुसार या तिघांवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात तिघांवर खटले भरण्यात आले होते. त्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्या तिघांना 3 दिवसांची सादी कैद किंवा 500 रुपये दंड भरण्याची शिक्षा दिली आहे.
दरम्यान 188 नुसार खटला भरल्यानंतर किमान 6 महिने कैद अशी शिक्षा होऊ शकते.
राज्यातील संचारबंदीचा आदेश न पाळल्याबाबत ही पहिली शिक्षा असून यामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
—चौकट—
शिक्षा कमी वाटत असेल पण…
न्यायालयाने दिलेली 3 दिवस कैद किवां 500 रूपयांची ही शिक्षा कोणालाही कमी वाटत असेल. पण त्याचे परिणाम मोठे असून, भविष्यात अडचणीची ठरणार आहे. शिक्षा लागल्यानंतर तुमच्या नावावर त्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पोलिसांचे चारित्र्य पडताळणी करताना अडचण येईल. तुम्हाला शासकीय नोकरी मिळू शकणार नाही. तर, पासपोर्ट, शस्त्र परवाना, व्यवसाय परवाने मिळताना अडचण येणार आहे. त्यामुळे याचा सर्वांनी गंभीर विचार करण्याची गरज आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरून पोलिसांचे काम वाढवू नये तसेच स्वतःचे करियर धोक्यात येईल असे करू नये असे आवाहन केले आहे.