नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ( Reliance Industries Limited) शेअर्समध्ये ( Shares) सोमवारी मोठी घसरण झाली. सप्टेंबर मधील तिमाहीत नफ्यामध्ये घसरण झाल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण झाली आहे. तब्बल ६ टक्क्यांनी या शेअर्समध्ये घसरण झाली असून कंपनीने तिमाहीचे आकडे स्टॉक एक्स्चेंजला ( Stock Exchange) दिले होते. यामुळे सोमवारी बाजार उघडताच रिलायन्सचे शेअर धडाधड कोसळायला सुरुवात झाली. बीएसईवर (BSE) कंपनीचा शेअर 5.54 टक्क्यांनी घटून 1940.50 रुपयांवर आला होता. तर एनएसईवरदेखील( NSE) 5.57 टक्के शेअर पडून 1940.05 वर आला होता.
या पडझडीमुळे कंपनीचे बाजार मूल्य एका झटक्यात 68093.52 कोटींनी कमी झाले. ते सध्या 13,21,302.15 कोटी रुपये झाले आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 15 टक्क्यांची घट नोंदविली गेली. कंपनीने आपल्या दुसऱ्या तिमाहीतील निकाल घोषित केले असून कंपनीला यामध्ये 9567 कोटींचा फायदा झाला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा फायदा 15 टक्क्यांनी कमी झाला आहे. गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत 11262 कोटींचा फायदा झाला होता. त्याचबरोबर यामध्ये महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या ( Corona) काळात रिलायन्समध्ये परदेशातून प्रमाणात गुंतवणूक झाली आहे.
जिओ ( Jio) नफ्यामध्ये
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जीओला ( Jio) या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत तिपटीने वाढला आहे. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला लाभ 2844 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत कंपनीला 990 कोटी रुपयांचा लाभ झाला होता. जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीला 2520 कोटींचा निव्वळ नफा झाला होता. त्यामुळे एकीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण झाली असली तरीदेखील जिओच्या नफ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे.