जयदत्त क्षीरसागरांनी मुस्लिम समाजात गुंड तयार केले

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – एमआयएमचे बीडचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी मुस्लिम अल्पसंख्यांकांवरून जयदत्त क्षीरसागर यांच्यावर घणाघाती टीका केली. “मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या जोरावर जयदत्त क्षीरसागर यांनी 50 वर्षे सत्ता भोगली असे शेख म्हणाले. जयदत्त क्षीरसागर यांनी समाजासाठी काहीच केले नाही, उलट गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांनी तयार केले. जेलमध्ये जाणारे त्यांचेच कार्यकर्ते आहेत. त्यात मरणारे मुस्लिम आणि मारणारे मुस्लिमच असतात. हा उद्योग क्षीरसागरांनी केला” असा आरोपही शेख यांनी केला. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

शेख निजाम म्हणाले, “2004 पासून मुस्लिम समाजाच्या मुलींच्या वसतिगृहाचा निधी पडून आहे. पण नगरपालिकेने जागा दिली नाही. ही बाब आता मुस्लिम समाजाच्या लक्षात आली आहे. मुस्लिम समाज कधीच त्यांना माफ करणार नाही. मुस्लिम समाजच नाही तर इतर समाजाला तरी त्यांनी काय दिले” असा सवालही त्यांनी केला.

पुढे शेख म्हणाले, “बीड मतदारसंघात सगळ्या सत्ता क्षीरसागर कुटुंबाच्या घरात आहेत. मंत्री, आमदार, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, जिल्हापरिषद सदस्य, नगरसेवक. त्यामुळे बीडचा विकास खुंटला आहे. खरा जातीवाद क्षीरसागर कुटुंबाने केला. येत्या निवडणुकीत एमआयएम आणि मुस्लिम समाज त्यांना जागा दाखवून देणार आहे. किती वेळा मुस्लिम समाजाने त्यांना निवडून दिले. सत्ता दिल्या. त्यांनी काय विकास केला. एमआयएम फक्त निडवणूक लढवण्यासाठी नाही. बीडमध्ये क्षीरसागर यांच्या विरोधात कोणी सक्षम पर्याय आला तर एमआयएम त्याच्या पाठीशी उभी राहिल. बीडमधून क्षीरसागरांना संपवल्याशिवाय राहणार नाही.”

Visit : policenama.com