विधिमंडळ सदस्यांच्या वेतनात 30 % कपात,मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 4 महत्वाचे निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरना व्हायरसविरोधात लढा देण्यासाठी देशातील देवस्थान, उद्योगपती, बॉलिवूडमधील सिने कलाकरांकडून सरकारला आर्थिक मदत केली जात आहे. तसेच खासदार, आमदार यांनी देखील आपले वेतन दिले आहे. कोरनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची परिस्थिती लक्षात घेता राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात या महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2020 पासून पुढील वर्षापर्यंत म्हणजे एप्रिल 2021 पर्यंत 30 टक्के कपात करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले.

1. राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी शिफारस
राज्यात कोरोनाचे संकट असत्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त आहेत, त्यापैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

2. आर्थिक पुनरुज्जीवनासाठी दोन समित्या
कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन समित्या नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिली समिती ही आर्थिक परिणामांचा पुनरुज्जीवन अहवाल तयार करणार आहे. यामध्ये अर्थतज्ज्ञ, उद्योजक, निवृत्त अधिकारी, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असणार आहे. तर दुसरी समिती ही मंत्रिमंडळातील सदस्यांची असून यात उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, अशोक चव्हाण आणि अनिल परब हे असणार आहेत.

3. ध्वजारोहण साधेपणाने
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 मे रोजी राज्यभरात होणारे ध्वाजारोहण हे केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी कोणताही समारोह किंवा परेड होणार नाही.

4. निवारा केंद्रात भोजनाची क्षमता वाढवणे
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक करण्याबाबत आणि निवारा केंद्रामध्ये भोजन, शिवभोजन यांची क्षमता अधिक वाढवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच लाभार्थी नागरिकांना अधिक चांगली सुविधा देण्याचा देण्याबाबत महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या. याची देखील काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला.