CM ठाकरेंचे कडक Lockdown चे संकेत?, म्हणाले – ‘हळूहळू बंद केल्यास लोक ऐकत नाहीत, त्यापेक्षा…’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक भागांमध्ये निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. त्यामुळे आता कोरोना रोखण्यासाठी ठाकरे सरकार काय पावल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 3) संपूर्ण लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत. हळूहळू गोष्टी बंद करून आपण प्रयत्न करून पाहिले. पण लोक ऐकत नाहीत. त्याऐवजी एकदम बंद करून हळूहळू गोष्टी सुरू केल्यास फायदा होतो, हा आपला अनुभव असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी संपादकांसोबतच्या बैठकीत केले आहे.

राज्यातील प्रसारमाध्यमांच्या संपादकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी लॉकडाऊन अटळ असल्याचे संकेत दिले आहे. यावेळी बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित होते. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण पाहता राज्यात कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे मत आरोग्यमंत्री टोपे यांनीही व्यक्त केले. त्यामुळे लवकरच संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा लॉकडाऊन 8 ते 15 दिवसांचा असू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा निर्धार व्यक्त करतानाच, एक-दोन दिवसांत कडक निर्बंध लागू करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. लॉकडाऊन हा उपाय नाही, पण दृश्य स्वरूपात बदल दिसले नाहीत आणि काही वेगळा उपाय मिळाला नाही, तर पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आज विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञांशी चर्चा केली. प्रसारमाध्यमांच्या संपादकांसोबतही त्यांनी चर्चा केली. यावेळी संपादकांनीही कोरोना साखळी तोडण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. राज्य सरकार कुठलेही आकडे लपवत नाही, सर्व माहिती खरी दिली जात आहे. माध्यमांनीही जनजागृती करून कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्याचा निर्धार करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात यापूर्वीच जिल्हापातळीवर लॉकडाऊन संदर्भातील कडक नियम लागू केले आहेत. पुण्यात आजपासून अंशत: लॉकडाऊन केला आहे. बीड, अमरावती, बुलढाणा, सोलापूरमध्येही कडक नियमांची तर काही ठिकाणी विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे कडक निर्बंध लादूनही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र दिसून आल्याने आता अधिकृतरित्या संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय उरलेला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.