‘आताही सांगतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही, कारण…’ : राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. ज्या सरकारमध्ये एकोपा नसतो एकमेकांना विचारलं जात नाही, ते जास्त काळ टिकणार नाही, असे मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. एका टिव्ही चॅनलच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनच्या मुद्यावरून बोलताना राज ठाकरे यांनी लॉकडाऊन हटवून सर्व सुरळीत केलं जावं. राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकेड बोट दाखवतं, पण लोकांना याविषयी काहीही देण घेणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा, असे राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री टिव्हीवरच दिसतात
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असलेल्या तीन पक्षांमध्ये एकोपा नाही. या सरकारमध्ये एकमेकांना विचारलं जात नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही. असे राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री हे शासकीय पदावर आहेत. त्यांनी बाहेर पडून काम केलंच पाहिजे. मला गेले काही महिने ते केवळ टिव्हीवरच दिसले. त्यांचा कारभार दिसलाच नाही. आता कुठे ते कामकाजाला सुरुवात करत आहेत. त्याबद्दल काही अधिक बोलावसं वाटत नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

लॉकडाऊन-अनलॉकचा ताळमेळ नाही
कार्यक्रमादरम्यान लॉकडाऊन आणि अनलॉकवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, काही दिवसापूर्वी मंत्रालयात एक बैठक पार पडली. या बैठकीत मी अनलॉक कधी करणार हे विचारलं होतं. त्याच उत्तर आतापर्यंत मिळालेलं नाही. सरकारने नियमाप्रमाणे दुकानं सहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास सांगितले आहे. काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं आहे. ते सहा वाजेपर्यंत काम करतात. तर मग त्यांनी सामान घेण्यासाठी कधी जायच. एक दिवस एका फुटपाथवरची दुकानं सुरु ठेवायची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणची उघडी ठेवायची. लॉकडाऊन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही, असे ते म्हणाले.

मनोरंजन क्षेत्राला आता मोकळीक द्या
मनोरंजन क्षेत्राला आता मोकळीक देयला हवी. मात्र तिथे उगाच काही वाकडे तिकडे नियम लावता कामा नये. आज जगातील अनेक देशांत सगळं सुरळीत झालं आहे. आपण पुरेशी काळजी घेतली पाहिजे. पण आता बंद ठेवणं हा मार्ग नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.