35 ग्रामपंचायतीमध्ये मनसेची विजयी ‘पताका’, अभूतपूर्व यशानंतर मनसेने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकालानंतर भाजपने तसेेच महाविकास आघाडीनेही आपणच बाजी मारल्याचे सांगितले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत मनसेने स्वत:कडे सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानुसार मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत ताकद लावल्याचं दिसतंय. निवडणुकीत मनसेने मुंबईजवळची ग्रामपंचायत असो की तिकडे विदर्भ, आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. तब्बल ३५ ग्रामपंचायतीमध्ये मनसेने विजयी पताका फडकवलेली आहे.

दरम्यान, या यशानंतर मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी फेसबुकद्वारे निवडून आलेल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन केले आहे. अनिल शिदोरे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ऐकताना पाय जमिनीवर आहेत असं वाटतं. परिस्थितीबरोबर आपली नाळ जुळल्याचं जाणवतं. काहीतरी आपल्या आवाक्यातलं, आपल्या जगण्यातलं असल्यागत वाटतं. लोकशाहीचं खरं रूप भेटल्याचा आनंद होतो, अशी भावना अनिल शिदोरे यांनी व्यक्त केली आहे.

जागा कमी मिळाल्या असल्या तरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मनसेने ग्रामीण भागात शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. ठाणे, बीड, अमरावती, बुलढाणा, अहमदनगर, याठिकाणी मनसेने आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. अंबरनाथ येथील काकोळे ग्रामपंचायत मनसेने बाजी मारली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिरसाटवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. तेथे ९ सदस्य निवडून आले आहेत.

तत्पूर्वी, मनसेने एकट्या यवतमाळमध्ये १५ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. बुलढाण्यात जिगाव ग्रामपंचायतीवर असलेली शिवसेनेची २५ वर्षाची सत्ता उलथवून मनसेने विजय पटकावला आहे. याठिकाणी ९ पैकी ७ जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. उस्मानाबादमध्ये जळकोटमध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनीही विजय मिळवला आहे. औरंगाबादच्या रेणापूरमध्ये मनसेने ७ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत. रायगडच्या जोहे येथे मनसेचा १ उमेदवार जिंकला आहे. जुन्नरच्या खिल्लारवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने झेंडा फडकवला आहे. अजूनही राज्यात ठिकठिकाणी मनसेप्रणित आघाडीचे उमेदवार जिंकल्याची माहिती आहे.

अमरावतीतील अचलपूर तालुक्यात खैरी सावंगी वाढोवा ग्रामपंचायतीत मनसेचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आले आहेत. रत्नागिरीच्या नवशी ग्रामपंचायतीत मनसेने खाते उघडले आहे. बीडच्या केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने वर्चस्व मिळवलं आहे, याठिकाणी ७ पैकी ५ जागांवर मनसेच्या सदस्यांचा विजय झाला आहे.

शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही-  देवेंद्र फडणवीस

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाराष्ट्रात काही भागात वर्चस्व आहे. राज्यात गावागावांमध्ये काही आम्ही प्रचाराला जात नाही. तेथील स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेच मेहनत घेत असतात. शिवसेना हा काही महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही. पण भाजपचं असं नाही. भाजप संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्हाला तिन्ही पक्षांच्या विरोधात यावेळी लढावं लागलं. त्यामुळे आम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रात स्पेस आहे असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गावांमधील जनतेचाही महाविकास आघाडीवर विश्वास-  आदित्य ठाकरे

ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झाला, अशी प्रतिक्रिया मंत्री आदित्य ठाकरे यांनी ग्रामपंचायतीच्या निकालांवर दिली आहे. शहरांपासून गावांपर्यंत लोकांचा या सरकारवर विश्वास आहे. कोरोना काळात सरकारने परिस्थिती कशी हाताळली आहे, हे लोकांनी बघितलं आहे. पर्यावरणाचा समतोल राखत विकास करत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.