मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत पाणी साचून मुंबई तुंबली नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी चांगलाच समाचार घेतला होता. आता मनसेनेही आपल्या अनोख्या स्टाईल ने या वक्तव्याचा निषेध करताना महापौरांना नीट दिसत नसावं असं म्हणत एक जाड भिंगाचा चष्मा भेट दिला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ट्विटरवर एक व्हिडिओही शेअर केला आहे.
काय म्हणणे आहे ‘मनसे’चे :
देशपांडे यांनी या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे, ‘मुंबईत तुंबलेलं पाणी आणि लोकांना झालेला त्रास यांपैकी काहीही महापौर महाडेश्वर यांना दिसलं नाही. आम्हाला असं वाटतं की त्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम असावा. कारण मुंबईतील कित्येक भागात पाणी तुंबले असताना महाडेश्वर मुंबईमध्ये कुठेच पाणी तुंबलेले नसल्याचा दावा करत आहेत. म्हणून खास महापौरांसाठी हा जाड भिंगाचा चष्मा आणला आहे आणि कुरीयर द्वारे त्यांना पाठवत आहोत.’ या चष्म्यातून तरी महापौरांना दिसावं अशी आमची अपेक्षा असून महाराष्ट्रातील इतरही काही नेते ज्यांना लोकांच्या समस्या कळत नाहीत, लोकांचे दुःख-दारिद्रय दिसत नाही त्या सर्वांना आम्ही अशा प्रकारे जाड भिंगाचे चष्मे पाठविण्याची व्यवस्था करणार असल्याचे देशपांडे म्हणाले.
मुंबई एकाच पावसात जलमय झाल्यानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर ह्यांच्या बेजबाबदार विधानाचा मा. मनपा गटनेते व मनसे सरचिटणीस @SandeepDadarMNS ह्यांच्याकडून खरपूस समाचार… pic.twitter.com/jfeNhp5kU3
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 2, 2019
महापौरांचे वादग्रस्त वक्तव्य :
रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालेले असताना मुंबई कुठेच तुंबली नाही, तुम्ही विनाकारण प्रश्न निर्माण करत असून मुंबईत सारे काही व्यवस्थित सुरू आहे. कुठेही पाणी तुंबलेले नाही, किंवा वाहतूक कोंडीही झालेली नाही तसेच मुंबईतील सर्व शाळा, कॉलेज सुरू असून मुंबईकर नेहमीप्रमाणे कामावरही गेले आहेत. त्यामुळे मुंबई पूर्वपदावर आहे, असा अजब दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला होता.
मुंबईत वाहतूक कोंडी नेहमीचीच असून ती फोडण्यासाठी आम्ही विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र पाणी तुंबल्याचे वक्तव्य खोटे असून तुम्ही मला पाणी कुठे तुंबले हे दाखवा, मी त्या ठिकाणी तुमच्यासोबत प्रशासनाला घेऊन येतो, असे आव्हानही त्यांनी पत्रकारांना दिले होते. महापालिका उपायुक्तांनी देखील महापौरांच्या या दाव्याचे समर्थन करत प्रसारमाध्यमांवरच तोफ डागली होती. त्यानंतर मात्र सर्वानीच त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली होती.
केवळ पूजेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही ‘तुळस’ आहे उपयुक्त
चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी ‘हा’ फेसपॅक लावा ; जाणून घ्या प्रोसेस
रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा
ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती
बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार
आदिवासींसाठी स्वतंत्र आरोग्य संस्था असायला हवी