‘ते’ अफजल खानाचा कोथळा काढण्यासाठी गेले आणि ढोकळा खाऊन आले : नवाब मलिक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पहिले मंदिर, फिर सरकार’ बोलणारे उद्धव ठाकरे अमित शाहांपुढे झुकले. वाघाची बकरी झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी गेले आणि ढोकळा खाऊन परत आले. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. नाशिक येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

नाशिक लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेना – भाजपा महायुतीवर निशाणा साधला. भाजपने मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केले त्यावेळी अनेकजण मोदींचे कौतुक करत होते. तसेच मोदी मोदी असा नाराही देत होते. मात्र, आता कोणीच काही बोलत नाही. बी. एस. एन. एल. च्या कर्मचाऱ्यांचा पगार अजून दिलेला नाही. रेल्वे विभाग जिओ टेलिफोन खरेदी करत आहे. यावरुन हे सरकार कोण चालवत आहे हे स्पष्ट होते. हे सरकार मोदी, शहा आणि अंबानी हेच चालवत आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिले मंदिर, फिर सरकार असे म्हणत होते. मात्र ते आता अमित शाहांपुढे झुकले. वाघाची बकरी झाली. असा टोलाही त्यांनी लगावला. याचबरोबर, उद्धव ठाकरे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी गेले आणि ढोकळा खाऊन परत आले. मग हे वाघ आहेत का बिननखाचे वाघ ? असा सवालही त्यांनी केला.